मुसळधार पावसामुळे बेंगळुरू पाण्याखाली   

बेंगळुरू: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बेंगळुरू पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. बरेच लोक ऑफिसला उशिरा पोहोचले किंवा पावसात अडकल्याने पुन्हा माघारी फिरले.बेंगळुरू केंद्र, भारतीय हवामान विभागने (IMD) बेंगळुरू पावसाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता.आता मंगळवारीही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
चक्रीवादळ आणि वाऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीनुसार, कर्नाटकात, विशेषतः किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल. पुढील दोन दिवस बेंगळुरूमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती बंगळुरू केंद्राच्या संचालकांनी दिली आहे. रविवारी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. सोमवारीही पाऊसाचा जोर कमी असला तरी पाऊस सुरूच आहे. 'यलो अलर्ट' दरम्यान, काही भागात तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, वाहतुकीत किरकोळ व्यत्यय येऊ शकतो आणि कमकुवत झाडे आणि फांद्या उपटून टाकल्या जाऊ शकतात, असा इशारा आयएमडीने दिला आहे.
 
कर्नाटकातील २३ जिल्ह्यांमध्ये अलर्ट
 
भारतीय हवामान विभागने गुरुवारपर्यंत कर्नाटकातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे, ज्यामध्ये बेंगळुरूचाही समावेश आहे. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवार आलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम झालेल्या जिल्ह्यांमध्ये बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण, कोलार, चिक्कबल्लापुरा, तुमाकुरू, मंड्या, म्हैसूरू, हसन, कोडागू, बेलागावी, बिदर, रायचूर, यादगीर, दावणगेरे आणि चित्रदुर्ग यांचा समावेश आहे.
 
चक्रीवादळाचा परिणाम
 
आज सकाळी आयएमडीने जारी केलेल्या अलर्टनुसार, आग्नेय बंगालच्या उपसागरावर तसेच आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांवर असलेल्या वरच्या हवेच्या चक्राकार अभिसरणामुळे हवामानात हा बदल झाला आहे. यासोबतच, तेलंगणा ते उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला आहे, ज्यामुळे लक्षणीय आर्द्रता निर्माण होत आहे आणि यामुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे.
 
अनेक भाग पाण्याने भरले 
 
गेल्या २४ तासांत एकट्या बेंगळुरू शहरात १०३ मिमी पाऊस पडला. बेंगळुरूमधील होरामावू येथील साई लेआउट हा आतापर्यंत पावसाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे लेआउटमध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. लोकांनी पाणी साचण्यासाठी तुंबलेल्या गटारांना जबाबदार धरले आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही गटारांची साफसफाई झाली नसल्याचा दावा केला. 
 
टॅनरी रोडवरील एनसी कॉलनीतील लोकांच्या घरातही पाणी शिरले. तथापि, यामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. जयनगरमध्ये मुसळधार पावसामुळे एक झाड उन्मळून पडून तिथे उभ्या असलेल्या कार आणि जीपवर पडले, ज्यामुळे त्यांचे नुकसान झाले. पाणी साचल्यामुळे काही रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या भागांना यलो अलर्ट दिला असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान विभागने केले आहे. 

Related Articles