शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?   

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

देशातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांने चाकून गळा कापून आत्महत्या केली. त्यासंदर्भाने त्याने व्हॉटसअप स्टेटस ठेवला होता. पोलीसांच्या तपासात उत्कर्ष महादेव शिंगणे हा विद्यार्थी शैक्षणिक दबावामुळे नैराश्यात होता. त्यातून आत्महत्या झाली असल्याचे म्हटले आहे, तर नागपूरला दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा दिली आणि आता पुन्हा नापास होण्याच्या भितीने आर्यन लुटे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थींनीने आत्महत्या केली. या सर्व घटना होत असतानाच, निकालाच्या भितीने एका सातवीच्या वर्गातील विद्यार्थीनीने घरातून पलायन केल्याची घटना समोर आली. 
 
या निर्णयामागे विद्यार्थ्याची स्वविचाराची वाट नाही, तर मनात पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि पालकांच्याविषयीचीभिती होती, मार्कांचा ताणतणाव होता. भविष्यात हा भितीचा स्तर निम्म प्राथमिक स्तरापर्यंत आला तर नवल वाटायला नको. ही वाट अशीच चालणे होत राहिली, तर उद्या ही संख्या अधिकाधिक वाढत जाण्याची धोका आहे. परीक्षा आणि निकालाची भिती म्हणजे शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू झाल्याचा पुरावा मानायला हवा. शिक्षण हे आनंददायी असताना ते भिती आणि तणावाच्या दिशेने जात असेल तर पालक आणि शिक्षणात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने यासंदर्भाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
 
मागील आठवडयात नागपूर शहरातील इयत्ता सातवीची विद्यार्थींनी परीक्षेच्या निकालाच्या भितीने घरातून पळून गेली. पळून जाताना तीने आपल्या लहान बहिणीला देखील सोबत नेले होते. पोलीसाची कर्तव्यदक्षता आणि जागृकतेमुळे मुलगी सापडली आणि पालकांच्या हाती सापडली. चौकशीनंतर निकालाच्या भितीने तिने घर सोडल्याचे तिने सांगितले. ही घटना घडून चार पाच दिवस होत नाही तोच खरगपूरच्या आयआयटीमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे वृत्त येऊन धडकले. उत्कर्ष नामक विद्यार्थ्यांने गळा कापून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण नोंदवताना अभ्यासाचा ताण आणि नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठठी मागे ठेवली. गेले काही वर्षापासून कोटा येथील आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरू आहे. शिक्षणाचा हा परिणाम अत्यंत नकारात्मक आहे. शिक्षणामुळे हे घडत असेल, तर शिक्षणाच्या संदर्भाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. शिक्षणामुळे कोणत्याही बालकाचा मृत्यू हा शिक्षण व्यवस्थेसाठी वेदनादायीच म्हणायला हवा.
 
एकिकडे पाल्यांचा बळी जातो आहे. त्यांचे आयुष्य अंधाराच्या खाईत लोटले जात आहे. गेले काही वर्ष विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढता आहेत. जीवन जगण्याची वाट समृध्द करण्याच्या प्रवासात, वाट समृध्द होण्याऐवजी अंधारमय बनते आहे. शिक्षणाने जीवन समृध्द बनायला हवे. जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षणाने हिम्मत देण्याची गरज आहे. मात्र तसे न घडता ही कोवळी पानगळ होत असेल, तरपालक आणि व्यवस्थेने मुलांच्या आत्महत्या, भितीयाकडे अधिक गांभीर्यांने पाहायला हवे. उद्याचेराष्टाचे, समाजाचे आणि कुटुंबाचे देखील भविष्य ज्या बालकांच्या हाती आहे ती पिढीच निराशाग्रस्त बनण्याचा धोका वाढतो आहे. खरेतर मुलांचे शिक्षण आनंदाने होऊ देणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. पालक म्हणून अपेक्षांचे ओझे सतत लादले जात आहे. पालकांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग म्हणून पाल्यांकडे पाहिले जात आहे. समाजात पालकांची प्रतिष्ठा पाल्यांच्या मार्कांच्या आलेखात दडलेली आहे. शिक्षण म्हणजे मार्क नाही हे लक्षात घेऊन मुलांना मुक्तपणे विकसित होऊ देण्याची गरज आहे. आज मुलांची अभिरूची, कल लक्षात घेऊन अभ्यासक्रम, शाखा निवडण्याऐवजी केवळ गुणांची सूज लक्षात घेऊन प्रवेश घेतले जात आहेत. आज पालकांनी लादलेल्या विविध अपेक्षांच्या ओझ्याखाली मुले दबून जाता आहेत. जीवन फुलण्यासाठीच्या मार्गांच्या विचारापेक्षाकेवळ आर्थिक लाभ मिळून देणारे आणि अत्यंत प्रतिष्ठा मिळून देणार्‍या अभ्यासक्रमाला पसंती दिली जात आहे. हा एकेरी प्रवास करण्यासाठी पालक आग्रह करताना दिसता आहेत. खरतंर जीवन हेच शिक्षण असायला हवे.शिक्षण सुरू असतानाच जीवनाला सामोरे जाण्यासाठीची तयारी व्हायला हवी आहे. आज मात्र शिक्षण सुरू असताना विद्यार्थी जीवन जगत नाही. आज पालकांचा आग्रह हा पुस्तकातील माहितीच्याअभ्यासासाठीचा आहे. त्यामुळे जीवनकौशल्य, क्षमता, मूल्यांचा विचार रूजवण्याचा प्रयत्न होत नाही. जीवनात समस्या निर्माण झाली, तर त्याचे निराकरण करण्याची विचारशक्ती विद्यार्थ्यांच्यामध्ये दिसत नाही. विद्यार्थ्यांची मस्तके सशक्तपणे घडत नाही. त्यातून मानसिक क्षमतांचे विकसन होत नसल्याने विद्यार्थी तणावाखाली येता आहेत.विद्यार्थ्यांना स्वतःची अभिरूची, कल, आवडीपेक्षा पालकांच्या इच्छेसाठी मार्ग निवडावा लागत आहे. 
 
जगात मातृत्व आणि पितृत्व नैसर्गिक रित्या मिळते. मात्र त्यापलिकडे असलेल्या पालकत्वाचा मार्ग चालण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. १८३५ साली फरार यांनी लिहिलेले कुटुंबप्रवर्तननीति या पुस्तकात पालकत्वासंदर्भाने अत्यंत मोलाचा संदेश नमूद केला आहे. श्रीमती फरार लिहितात की, मुलांचे केवळ पालनपोषन केले म्हणजे आईबाबांची जबाबदारी संपत नाही. त्यांना सुमार्गाकडे वळवावे लागते. ती जबाबदारी आईबाबांची आहे. आज पालनपोषण करण्याची आणि शिक्षण देण्याची जबबादारी पालकांची आहे असे मानले, तरी शिक्षणाचा अर्थ केवळ अक्षर साक्षरता आणि मार्क एवढया पुरता मर्यादित नाही. वर्तमानात पालकत्वाच्या शिक्षणाची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. शिक्षणाचा मूलभूत अर्थ हरवत चालला आहे. पालकांना आपल्या पाल्याची अधिक चिंता सतावते आहे. पाल्याचे जीवनातील यश म्हणजे फुलने, बहरणे, स्वयंस्फुर्तीने वाटा चालनेनाही, तर पैसा, संमत्ती, सत्ता मिळवणे. खरंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या सर्व भावंडापैकी त्यांच्या आईला सर्वाधिक चिंता रवींद्रनाथाची होती. या मुलाचे भविष्यात काय होईल..? तो जीवनात यशस्वी होईल का ? जीवनाला खरच सामोरे जाऊ शकेल का ? असे अनेक प्रश्न त्यांना पडत होते. मात्र आज वर्तमान पाहिले तर रवींद्रनाथाच्या इतके कोणी यशस्वी झाले असे दिसत नाही. ज्या मुलांची चिंता होती तोच मुलगा आज जीवनात नोबेल सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवत साहित्याच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे. आईन्स्टाईन हे देखील अगदी प्राथमिक शाळेतील परीक्षा नापास झाले होते. शिक्षकांनी लिहिलेल्या नोंदीमध्ये हा मुलगा शिक्षणात यशस्वी होऊ शकणार नाही असे मत नोंदवलेहोते. त्यानंतरचा इतिहास अवघे जग जाणते आहे. शिक्षणातील मार्क आणि तेथील यश म्हणजे जीवनातील यश नाही. आजही जीवनात जी माणसं यशाच्या शिखरावर चढलेली दिसत आहेत. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आलेख अधिकाधिक उंचावला आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर शिक्षणात ज्याला यश म्हणतात ते कितीजनाच्या नशिबी होते. बहुतेकांना आपल्या शैक्षणिक आयुष्यात फारसे यश प्राप्त करता आलेले नाही. लता मंगेशकर इयत्ता तिसरीपर्यंत शिकल्या होत्या. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर दहावी नापास, समाजसेवक अण्णा हजारे नववी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सातवीपर्यंत अशी कितीतरी माणसं शालेय परीक्षेत अपयशी ठरली असली तरी प्रत्यक्षात जीवनात यशस्वी झाले आहेत. त्यांचे शैक्षणिक अपयशाने त्यांचे जीवन आरंभी झाकोळले गेले, तरी जीवनातील कर्त्तृत्वाने त्यांचे अपयश चक्क कायमचे पुसले गेले आहे. त्याच्या जीवनाविषयी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्या यशात शिक्षणाचे अपयशाची दखलही घेतली जात नाही. त्यांच्या पालकांनी पाल्यांच्या शैक्षणिक अपयशाचा विचार केला नाही. त्यांच्या अपयशाशी आपली प्रतिष्ठा जोडली नाही. त्यांच्या भविष्याशी केवळ पुस्तकी अभ्यास जोडला नाही. प्रत्येकवेळी त्यांच्या अपयशातही आत्मविश्वासाने आधार देण्याचा प्रयत्न केला. दहावीत नापास झालेल्या सचिन तेंडूलकर यांचे मार्कशीट पाहिल्यावर निराश असलेल्या सचिनला वडील प्रा. रमेश तेंडूलकर म्हणाले, सचिन उचल ती बॅट आणि जा मैदानावर खेळायला. तुला जितका चांगला क्रिकेट खेळता येतो तेवढा चांगला क्रिकेट पास होऊन मार्क मिळवणार्‍या मुलांना कोठे खेळता येते ? मुळात आपल्या मुलाच्या संदर्भाने मार्कांपेक्षा गुण जाणता येणे हे पालकत्व आहे. पाल्यांच्या गुणांची ओळख झाली, तर त्यांचे भविष्य अधिक यशाच्या जवळ पोहचलेले अनुभवता येईल. मात्र आज पाल्यांच्या गुणांपेक्षा मार्कच वरचढ ठरता आहे.
 
आईबाबा हे पाल्यांचे पालक नाही, तर मालक झाले आहेत. पाल्यांकडून असलेल्या अपेक्षांमुळे विद्यार्थी निराशेच्या खाईत लोटली जाता आहेत. इतक्या लहान वयात निराशा, हृदय विकाराचा झटका विद्यार्थ्यांना येऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ माहिती नसताना मरणाची वाट चालावी लागते आहे. जीवन फुलवण्याच्या वाटा चालण्याऐवजी मृत्यूच्या वाटांचा प्रवास घडतो आहे. जीवनाची वाट चालण्याऐवजी त्यापासून पलायन करावे वाटते आहे, हे सारे शिक्षण प्रक्रियेतून अपेक्षित नाही. निर्भयता प्रदान करते ते खरे शिक्षण, अपयशाला सामोरे जाण्याची हिम्मत देते ते शिक्षण. आज अशा अपयशी मानसिकतेच्या,भितीने युक्त असलेले विद्यार्थी घडू लागले, तर आपला प्रवास महासत्तेच्या दिशेने खरचं होणार आहे का ? ज्या देशातील तरूणाईला आनंदाचे क्षण वाटयाला येणार नसतील तर त्यांना खरंच भविष्य असते का ? शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकलो नाही, त्यांना मृत्यूच्या खाईत लोटत गेलो, तर ते शिक्षण कुचकामी ठरण्याचा धोका आहे. अशा शिक्षणातून आपण माणूस नाही तर केवळ रोबोट निर्माण करतो आहोत. शेवटी शिक्षणातून माणूस घडणार नसेल तर ते शिक्षण कुचकामीच आहे. आपले वर्तमान पाहिल्यानंतर पालकांसाठी शाळा सुरू करण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. आज प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी विविध पदविका, पदवी अभ्यासक्रम आहेतच. मात्र माणसांची जडणघडण ज्यांच्या विचारधारेवर अवलंबून आहे. त्या पालकांना पालकत्वासंदर्भाने कोणतेच शिक्षण देण्याची व्यवस्था शिक्षणाच्या प्रक्रियेत नाही. खरेतर किमान पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात लवकरच पालक होणार आहेत. त्यांच्यासाठी नव्या शिक्षण धोरणानुसार किमान काही क्रेडीट गुणांचा अभ्यासक्रम सुरू केला, तर आपले भविष्य अधिक उज्ज्वलतेच्या वाटा चालू शकेल. पूर्वी असलेल्या एकत्रित कुटुंबपध्दतीने पालकत्वाचे संस्कार घडत होते. अलिकडे विभक्त कुटुंब पध्दतीमुळे पालकत्वाच्या संदर्भाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोघेही पती पत्नी नोकरी करत असल्याने पाल्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला गुणवत्तापूर्ण वेळ पाल्याच्या नशिबी दिसत नाही.पालकही विविध कारणांनी सतत तणावात आहेत, त्याचाही परिणाम पाल्यांच्या जीवनावर होतो आहे. त्यामुळे शिक्षणात मार्क की गुण, विचार की अनुकरण, पैसा की ज्ञान याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पालक शिक्षित झाले आहे मात्र वर्तमानात विद्यार्थ्यांच्यापेक्षा पालकांसाठीच अधिक सुशिक्षित बनवणारी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.
 
आज दुर्दैवाने समाजात ज्या विद्यार्थ्यांना अधिक मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक आहे. जीवानाला सामोरे जाण्याची शक्ती आणि वृत्ती निर्माण करण्यात अपयश आले आहे. शिक्षणातून चांगला माणूस घडवणे, विवेकी, शहाणपणाची वाट चालण्याची अपेक्षा असताना, पालकांना ते महत्त्वाचे वाटत नाही. पाल्याचा आनंद, समस्या निराकरणासाठीची वाट आणि जडणघडण महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी माहितीवर परीक्षेच्या मूल्यमापनात उत्तीर्ण होतो मात्र जीवनाच्या परीक्षेत हे विद्यार्थी सातत्याने अपयशी होता आहेत. मुळात पालकांच्या या मागणीमुळे विद्यार्थी केवळ माहितीने संपन्न बनत जातात मात्र ते ज्ञानाची वाट चालणे घडत नाही. त्यामुळे परीक्षेत यश मिळत असले तरी ज्ञाना अभावी जीवनात यशस्वी होत नाही. त्यामुळे पालकांनी आपला पाल्या उद्यासाठीचा नागरिक उत्तम घडेल यावर लक्ष केंद्रित केले तरच आपण उत्तम नागरिक आणि समाज निर्माण करू शकू.
 

Related Articles