वाचक लिहितात   

सुसंस्काराची गरज

ज्योती मल्होत्रा ते वैष्णवी हगवणे बातम्या सध्या गाजत आहेत. एक राष्ट्रीय स्तरावर तर दुसरे स्थानिक कळते. दोन्ही चे मूळ कारण पैश्यावर येऊन थांबते. दोन्ही प्रकरणे इतके दिवस चालले असताना गुप्तहेर यंत्रणा बेसावध कशी राहिली असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला. दोन्ही बातम्या महिला संबंधात असताना महिला आयोगाने काटेकोर दखल घेऊन एकीचा जीव वाचायला मदत नक्की झाली असती. बातम्या धडकल्यावर राजकीय आंदोलन असे प्रकारांना ऊत आला जी गोष्ट उबग आणणारी आहे. दोन्ही बातम्यांत महिला सुशिक्षित आहेत हे दुर्दैव म्हणता येईल. एकीने तर जीव गमावला आहे पण दुसरीचा शेवट शिक्षा हे अटल आहे. कोण गाफिल राहिले याची शहानीशाहा यथावकाश होईलच. परंतु ज्या बाळाची आई गेली त्या बाळाला आयुष्यात आई दिसणार नाही की आईचे प्रेम मिळणार नाही ही केवढी मोठी आणि भयानक शिक्षा नाही कां ? पैसा हे साधनही असू शकते व साध्य पण ठरू शकते यातून काय चांगले आणि काय वाईट हे शिकवणारे चांगले शिक्षण व संस्कार महत्त्वाचे आता काळाची गरज वाटते.

नीलम सांगलीकर, पुणे.

’पाक’प्रेमींवर कारवाई करा

विविध प्रकारच्या मिठाई ही राजस्थानची एक वेगळी ओळख आहे. असे म्हणतात मिठाई खाण्यात राजस्थानी मंडळींचा हात कुणीच धरू शकत नाही. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात तर नाक्यानाक्यावर मिठाईची दुकाने पाहायला मिळतात. पहलगाम हल्ल्यानंतर येथील मिठाईवाल्यांनी एक अनोखा निर्णय घेतल्याने जयपूरची चर्चा आज संपूर्ण देशभरात केली जात आहे. येथील सर्व प्रसिद्ध मिठाईना ‘पाक’ हा शब्द जोडला जातो. ‘गोंडपाक’, ‘म्हैसूरपाक’, ‘मावापाक’, ‘अंजीरपाक’, ‘काजूपाक’, ‘देसीपाक’ अशी या मिठाईंची नावे आहेत. यापुढे या मिठायांना ‘पाक’ ऐवजी ‘श्री’ हा शब्द जोडला जाणार आहे. त्यामुळे ‘गोंडपाक’चे नाव पालटून ‘गोंडश्री’ करण्यात आले आहे. ‘म्हैसूरपाक’चे नाव पालटून ‘म्हैसूरश्री’ करण्यात आले आहे. पाक या शब्दाप्रती पदार्थाच्या नावातून पाक हटवण्यापेक्षा पाकप्रेमीना देशातून हटवणे योग्य होईल.

सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 

‘लाख’मोलाचे सोने!

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे घसरते मूल्य, वाढते आयात शुल्क आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अखेर भारतात सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा ओलांडलाच. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरू होती. त्यामुळे सोन्याचा दर एक लाखावर पोहोचला. सोन्याचे दर लाखाच्या पार गेल्यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणार्‍यांच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. दुसरीकडे, सोन्याचा भाव नवनवे उच्चांक गाठत असला तरी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीसाठी झुंबड उडतच राहणार आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील ९५ टक्क्यांहून अधिक महिलांना सोन्याचे आकर्षण आहे. सोने ही एक सुरक्षित मालमत्ता आणि गुंतवणूक मानली जाते.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

नियम पाळा, अपघात टाळा 

महामार्गावर वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी १०० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात. मालमोटार व इतर मोठ्या वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. काही वाहन चालक तर दारु पिऊन वाहने चालवतात, तर काही वाहन चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलतात. वाहनांची व्यवस्थित निगा न राखणे, सीटबेल्ट न लावणे या गोष्टीही अपघातास कारणीभूत ठरतात. नियम माहीत असूनही चालक त्यांचे पालन करत नाहीत.  नियमांचे पालन न केल्यानेच अपघातांची संख्या कमी होत नाही. अपघातांची संख्या कमी करायची असेल, तर वाहन चालकांना नियमांचे पालन करावेच लागेल. नियम पाळा अपघात टाळा! 

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

पावसाळी कामे तकलादू

अवकाळी पावसाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांना झोडपून काढले आहे यंदा पाऊस लवकर येण्याचे हवामान शास्त्रांकडून संकेत मिळत आहेत त्यामुळे पावसाचे काऊंट डाऊन सुरु झाले आहे मात्र मुंबईसह अनेक मोठ्या महानगरांत पहिल्याच पावसाने पाणी तुंबले जाते. त्याचा सर्वांना त्रास होतो कारण नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, नविन रस्त्यांची कामे त्याचप्रमाणे गटारे साफ करणे, गटारातील कचरा काढल्यानंतर लगेचचं त्याची विल्हेवाट लावणे हि कामे अजुनही प्रलंबित आहेत. अनेक अपघात, आजार बळावण्याची दाट शक्यता असते आतापर्यंत ७० टक्के मान्सूनपुर्व कामे झाल्याचे महापालिकांतर्फे सांगण्यात आले होते मात्र आताच्या पडणार्‍या अवकाळी पावसाने हि कामे कशी तकलादू असतात हे दाखवून दिले आहे त्यामुळे मान्सूनपूर्व पावसात अशी शहरांची अवस्था होत असेल तर पावसाळ्यात कशी हा संशोधनाचा विषय आहे. महापालिकांतर्फे सद्या राबविण्यात येत असलेली कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे ! 

राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव 

 

Related Articles