मावळात अवकाळी पाऊस; खरीप भात पिकाच्या पूर्व मशागतीला उपयुक्त   

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) : राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून काही भागात शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान होत असताना मावळ तालुक्यात मात्र हा अवकाळी पाऊस खरीप भात पिकासाठीच्या पूर्व मशागतीला अतिशय उपयुक्त आणि चांगला असल्याचे मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.        
 
गेल्या आठवड्यापासून मावळ तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे मावळ तालुक्याच्या जनजीवनात जरी अडथळे येत असले तरी शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त आहे.मावळ तालुका हा प्रामुख्याने खरीप भात उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका आहे. या तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. या पिकासाठी मान्सूनच्या पावसापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस पडणे गरजेचे असते असा पाऊस पडल्याने भात पेरण्या आणि लावण्यापूर्वी पूर्व मशागती कामे करायला सोपे जाते. 
 
मावळ तालुक्यात गेली आठवडाभर दररोज अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याने त्या त्या विभागात शेतीची पूर्व मशागतीची कामे शेतकर्‍यांनी सुरू केलेली आहे. भात पिकासाठी लावणीसाठी तयार असणारी शेतजमीन करण्यासाठी या पावसाचा उपयोग चांगला होणार होत आहे.मावळ तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेरपर्यंत खरीप भात पिकाचा हंगाम असतो. त्यानंतर खरीप भात काढून घेतल्यावर काही शेतकरी हे रब्बी गहू हरभरा, वाटाणा, मसूर, रब्बी ज्वारी घेण्याचा प्रयत्न करतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत ही पिके शेतकरी काढून घेतात आणि त्यानंतर मात्र पुढच्या पिकाच्या साठी शेतकरी सज्ज राहतो.
 
ऐन उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मावळ तालुक्यात कडक उन्हाळा असून जमीन चांगली तापते. खरीप भात आणि रब्बी ज्वारी, गहू, हरभरा घेतल्यानंतर अशी तापलेली जमीन शेतकर्‍यांच्या दृष्टीने मशागत करण्याला अशाच प्रकारचा पाऊस पडणे गरजेचे असते. याबाबत सध्या चांगला पाऊस पडत असल्याचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
 
मावळ तालुक्यातील खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी मे महिन्यापासून शासनाच्या कृषी खात्याने नियोजन केलेले असून शेतकर्‍यांना खरीप भात पिकापूर्वीची पूर्वतयारी बी बीयाणांची निवड, रोपटे भाजणी तसेच रोपटे तयारीसाठी खते या गोष्टींची जमवा जमवीचे नियोजन शेतकरी करत असतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम, कार्यशाळा घेण्याचे काम मावळ तालुका कृषी खात्याने सुरू केलेले आहे. या पावसाने शेतकरी कामाला लागले आहेत.

Related Articles