पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका   

सुरेश भुजबळ

बेल्हे : मुसळधार पावसामुळे टोमॅटोची फळे काळी पडून त्यावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदाचा उन्हाळी हंगाम वाया गेल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना ५० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
 
मुसळधार पावसामुळे टोमॅटो फळे काळी पडून फळाला देठाजवळ चिरा पडल्या आहेत. त्यावर तिरंगा रोगाचाही प्रादुर्भाव तसेच विविध बुरशीजन्य, विषाणूजन्य रोगामुळे बागेतील सुमारे सत्तर टक्के फळे खराब झाली आहेत. मुसळधार पावसामुळे टोमॅटोची पाने पिवळी पडल्यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली आहे. खरेदीनंतर टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने नुकसान टाळण्यासाठी व्यापार्‍यांनी टोमॅटो खरेदी कडे पाठ फिरवली आहे. 
 
जुन्नर, आंबेगाव तालुक्यात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात अथर्व, साहू, विरांग आदी विविध जातीच्या संकरित टोमॅटोची लागवड केली होती. टोमॅटोचे पीक चांगले यावे यासाठी शेण खतासह विविध रासायनिक व जिवाणूजन्य खतांचा वापर केला.
 
टोमॅटो रोपांच्या पुनर्लागवडीनंतर उत्पादकांचा सुमारे दीड लाख रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे. टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार शंभर रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान सुरुवातीला बाजारभाव मिळाला. दोन ते तीन तोडे सुरळीत झाल्यानंतर १२ मे ते २८ मे दरम्यान मुसळधार पाऊस झाला. सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण, पाऊस याचा प्रतिकूल परिणाम टोमॅटो बागेवर झाला असल्याचे दिसून आहे. तीन लाख रुपये खर्च करून दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. तोडणी सुरू झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे बागेतील ६० ते ७० टक्के टोमॅटोची फळे खराब झाठी. टोमॅटोला प्रतिकिलोग्रॅम पाच ते दहा रुपये बाजारभाव मिळत आहे. यातून भांडवली खर्चही वसूल होत नाही, असे उत्पादक शेतकरी विलास काळे यांनी सांगितले. शेतकर्‍यांकडून टोमॅटो खरेदी केल्यानंतर वाहतुकीत टोमॅटो सडण्याचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. खरेदी टोमॅटोपैकी २५ टक्के टोमॅटो खराब होत आहेत. शेतकर्‍यांबरोबरच व्यापार्‍यांनासुद्धा आर्थिक फटका बसला असल्याचे टोमॅटो व्यापारी जालिंदर थोरवे यांचे म्हणणे आहे. बंगळूरूला टोमॅटो हंगाम सुरू असल्याने इतर राज्यातील व्यापारी नारायणगाव बाजारात अद्याप खरेदीसाठी आले नाहीत. आंब्यापासून ज्यूस तयार करायचं काम सुरू असल्याने ज्यूस उत्पादकांनी टोमॅटो खरेदी बंद केली आहे. पुढील पंधरा दिवसांत व्यापारी नारायणगावात दाखल होतील.त्यानंतर बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे,असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग घोलप यांनी व्यक्त केले.
 
शेतकरी उपाशी
 
तोडणी झाल्यानंतर निवड करून ६० ते ७० टक्के खराब फळे टाकून द्यावी लागतात. टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर क्रेटला (२० किलोग्रॅम) पन्नास रुपये ते तीनशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतो. वाहतूक, तोडणी मजुरी, उत्पादन खर्च आदीचा विचार करता सध्याचा भाव उत्पादकांना परवडत नाही.टोमॅटो बागांची सद्यःस्थिती पाहता पुढील एक ते दोन तोडे झाल्यानंतर टोमॅटोची बाग काढून टाकावी लागणार खते, कीटकनाशके, मल्चिंग कागद, ठिबक व मंडप साहित्याचे भाव यंदा वाढल्याने विक्रेते तुपाशी आहेत.

Related Articles