वाचक लिहितात   

हवामान खात्याचे फसवे अंदाज

यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगले आणि सर्वसाधारण असून भारतीय हवामान विभागाने सरासरी 106 टक्के पाऊस होईल असे वर्तवले आहे. शेतकर्‍यांसाठी ही एक आनंदाची बातमी असली तरी आपला देश कृषिप्रधान म्हणून जगामध्ये ओळखला जातो. त्यामुळे येथील शेतकरी आपापल्या राज्यामध्ये कृषिपूरक हवामानानुसार विविध पिकांचे उत्पादन घेत असतो. भारत सरकारकडून शेतकर्‍यांच्या माहितीसाठी टीव्ही, रेडिओ, मोबाईल, वर्तमानपत्र यांसारख्या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे शेतकरी यावर विश्‍वास ठेवून पेरणी करतात; पण गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज फोल ठरत असल्याचे वरचेवर निष्पन्न झाले आहे. पुन्हा एकदा हवामानाच्या अंदाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जून महिना मध्यावर आला तरी पाऊस नसल्याने पेरणी हंगाम पुढे जातो की काय अशी शंका येते आहे. शेतकरी महागडी औषधे, बि-बियाणे, कर्ज काढून शेती पिकवत असतो; पण भारतीय हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे बर्‍याच शेतकर्‍यांना फटका बसत आहे.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगाव 
 
सारे काही सत्तेसाठी...
 
‘सत्ता हातात असेल, तरच प्रश्‍न सुटतात. विरोधी पक्षात बसून आंदोलने, मोर्चे काढून चालत नाही,’ असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले. या विधानातून असा प्रश्‍न निर्माण होतो की, मग लोकशाहीतील विरोधकांचे अस्तित्व निरर्थक ठरते का? आंदोलने, मोर्चे, जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढा देणे - याला जर अजिबात किंमत नसेल, तर लोकशाही व्यवस्था कुठे उरते? अजित पवार यांचा राजकीय प्रवास पाहता, सत्तेसाठी कोणत्याही दिशेने वळण्याची त्यांची तयारी आपण पाहिलीच आहे. मग तो पहाटेचा शपथविधी असो, वा महाविकास आघाडी सोडून थेट भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय. या सार्‍या घडामोडींमध्ये तत्त्व, विचारसरणी आणि जनतेशी प्रामाणिकपणा यांचे काय? जर विरोधी आवाजच निरुपयोगी ठरवले जात असतील, तर सत्ताधार्‍यांना जबाबदार धरण्याची प्रक्रिया थांबेल. ही बाब लोकशाहीसाठी गंभीर आणि धोकादायक आहे. सत्ता हे अंतिम ध्येय नसून, ते लोकसेवेचे साधन असले पाहिजे, हे राजकारण्यांनी लक्षात ठेवायला हवे.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण?
 
औरंगाबादेतील वाळूंज भागातील पत्नी पीडित पुरुषांच्या आश्रमात काही पत्नी पीडित पुरुष दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळपूजन करून पिंपळपौर्णिमा साजरी करतात. हा प्रकार काहीसा विचित्र वाटत असला तरी खरा आहे. पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराचे बळी ठरतात, यावर अजूनही अनेकांचा विश्‍वास बसत नाही. याला कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती. पुरुषच महिलांवर अत्याचार करतो, त्यांचा मानसिक छळ करतो, हेच आजवर आपण पाहत आलो आहोत; पण आता काळ बदलला आहे. पुरुषही महिलांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत.आज कितीतरी पुरुष महिलांचा मानसिक अत्याचार सहन करत आहेत. पत्नी आपल्यावर अत्याचार करते, आपला मानसिक छळ करते हे जर समाजात माहीत झाले, तर आपलीच नाचक्की होईल या भीतीने अनेक पुरुष तो अत्याचार मुकाट्याने सहन करतात. ज्यांना हा अत्याचार सहन होत नाही, ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे महिलांप्रमाणेच पीडित पुरुषांनाही संरक्षणाचा अधिकार मिळावा त्यासाठी सरकारने कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कायद्यात दुरुस्ती करून पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण द्यावे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
बालमजुरीचे उच्चाटन व्हावे
 
देशात वाढती बालमजुरी ही देशाच्या विकासाला घातक आहे. बालकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारी तसेच त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक विकासाला बाधा आणणारी ही प्रथा समूळ निर्मूलीत होणे काळाची गरज आहे. बालकांचे बालपण हिरावून घेणारी बालमजुरी म्हणजे बालकांचे सर्व प्रकारचे शोषणच होय. बालकांचे बालपणी खेळणे, बागडणे, कौतुक, लाड, त्यांची काळजी, योग्य पोषण आहार, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, शाबासकी, सन्मान, सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या असताना त्यांना बालवयात वीट भट्टीवर काम करावे लागणे, हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागणे, लहान मुलींना दुसर्‍यांकडे झाड-झुड, भांडी घासणे ही कामे करावी लागणे ही बाब त्यांच्या बाल हक्कावर गदा आहे. आजची बालके ही या राष्ट्राची, राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांच्यावर असे प्रसंग येणे ही खरोखर अत्यंत दयनीय अवस्था होय. 
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

Related Articles