मुंबई, कोकणात मुसळधार   

 

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’
 
मुंबई, (प्रतिनिधी) ः वेळेआधी दाखल झालेल्या व नंतर काही दिवस शांत असलेल्या मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून, मुंबई कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांत सोमवारी धुवाधार पाऊस झाला. येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईसह चार जिल्ह्यांत रेड, तर उर्वरित २२ जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे काल मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबल्याने घरी परतताना चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. गेल्या चोवीस तासांत पुण्यातील दुर्घटनेसह विविध ठिकाणच्या घटनांमध्ये राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
अल्प विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या पावसाने शनिवारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोर धरला होता. मुंबईत रविवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई भागात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले होते. शहरातील परळ, लालबाग, सायन, चेंबूर, कुर्ला, सांताक्रूझ आदी भागांत पाणी साठल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. पाणी तुंबल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.  पावसाचा उपनगरीय रेल्वेसेवेवर, तसेच मेट्रो सेवेवरही पावसाचा परिणाम झाला होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ६.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ५.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
 
दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईला यलो अलर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा व कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली व परभणी या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाण्याचा समावेश आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे,
 
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७ मिमी पाऊस झाला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर १००.४ मिमी, मुंबई उपनगर ८६ मिमी, रायगड ७२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नदी पात्रातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  
 
२४ तासांत १८ जणांचा मृत्यू 
 
अहिल्यानगर जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन व्यक्तींचा मृत्यू तर सात व्यक्ती जखमी झाल्या असून नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन तर जालना जिल्ह्यात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून तीन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे. भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी, बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि चार व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाली.
 

Related Articles