जलदगती खटल्याचा निर्णय अद्याप नाही   

कल्याणीनगर अपघात प्रकरण 

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आजही न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाला गती मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी हा खटला जलदगतीने चालवण्यासाठी न्यायालयात पत्र दाखल केले आहे. मात्र, या खटल्याचा निर्णय न्यायालयाने अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे या निकालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
येरवड्यातील कल्याणीनगर भागात १९ मेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत पोर्श मोटार चालवून दोन आयटी अभियंत्यांचा बळी घेतला होता. घटनेनंतर अवघ्या बारा तासांच्या आत बाल न्याय मंडळाने आरोपी मुलास जामीन मंजूर केला. त्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी आजही न्यायालयीन कोठडीत आहे. मुलाला वाचवण्यासाठी आई शिवानीने त्याच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केले होते. या प्रकरणात शिवानीला न्यायालयाने जामीन दिला आहे. या खटल्याची सुनावणी सद्य:स्थितीत न्यायालयीन प्रक्रियेत आहे. मात्र, अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. त्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहेत.
 
आरोपी अल्पवयीन मुलाला सज्ञान समजून त्याच्याविरोधात पुन्हा खटला सुरू करावा, अशी मागणी देखील पोलिसांनी न्यायालयात केली आहे. परंतू, याचा निर्णय न्यायालयाने अद्याप घेतलेला नाही. या प्रकरणात विलंब होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 

Related Articles