बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे   

डॉ. न. म. जोशी यांचे प्रतिपादन 

पुणे : समाजात सभोवताली कौटुंबिक हिंसाचार, पहलगामसारखे दहशतवादी हल्ले अशा सांस्कृतिक र्‍हासाच्या घडामोडी घडत असताना केवळ शब्दांचे फुलोरे फुलवणारे लेखन पुरेसे ठरणारे नसून बालवयातच संवेदनशील मने घडतील, असे बालसाहित्य आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. 
 
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालवाङ्मय पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले, त्यावेळी डॉ. जोशी बोलत होते. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, ज्येष्ठ लेखिका डॉ. मंदा खांडगे, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, सल्लागार डॉ. संगीता बर्वे, विश्वस्त शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते. 
 
डॉ. जोशी म्हणाले, इतरांपेक्षा आपले साहित्य वेगळे ठरेल, वेगळा ठसा उमटवेल या दृष्टीने लेखकांनी साहित्य निर्मिती करावी. आपले लेखन हे ’फोकल पॉईंट’ लक्षात ठेवून उतरणे आवश्यक आहे. चारुहास पंडित म्हणाले, मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण होत असताना देखील लेखक निष्ठेने आणि पाय रोवून साहित्य निर्मिती करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. शहरांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठी शाळा मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेक स्तुत्य प्रयोगशील उपक्रम राबवित आहेत. आजची बालपिढी त्यांना उपलब्ध असलेल्या तांत्रिक साधनांमुळे अधिक स्मार्ट झाली असून, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. डॉ. मंदा खांडगे, एम.के. गोंधळी, गणेश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. विजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले. मृणाल जैन यांनी आभार मानले. 

Related Articles