‘डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरेल’   

पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा  निखळला आहे. डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते, अशा शब्दात विविध क्षेत्रातून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
डॉ. नारळीकर यांनी आपल्या संशोधन, लेखन आणि विज्ञानप्रसाराच्या कार्यातून विज्ञानाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. महापौरपदावर असताना डॉ. नारळीकर यांची भेट घेतली होती. शरीर थकलेले असतानाही त्यांच्यातील उत्साह माझ्यासारख्यालाही लाजवणारा होता. संशोधक म्हणून असणारी त्यांची उंची उत्तुंग तर होतीच, पण त्यांच्यातील माणूसपणही भावणारे होते. सामान्यांमध्येही विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात डॉ. नारळीकर यांच्या लेखणीचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने विज्ञान जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
 
भारतीय विज्ञान विश्वातील एक तेजस्वी तारा कायमचा नजरेआड गेला आहे, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. माशेलकर म्हणाले, डॉ. नारळीकर यांच्या निधनाने एक युग संपले आहे! सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी मांडलेला  ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ हा केवळ गणिती कल्पनेचा पराकाष्ठा नव्हता, तर तो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयीच्या विचारांना एक धाडसी वैकल्पिक दिशा देणारा होता. परंतु, त्याहून मोठे कार्य त्यांनी विज्ञान सामान्य माणसाच्या हृद्यात पोहोचवून केले. त्यांच्या लेखनाने, व्याख्यानांनी आणि दूरदर्शनवरील मालिकांनी लाखो विद्यार्थी आणि नागरिक विज्ञानांच्या प्रेमात पडले. डॉ. नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, ते विज्ञानाचे तत्वज्ञ होते. त्यांनी जीवन जगले विचारांसाठी, शोधासाठी आणि समाजासाठी!
 
विज्ञान प्रसारकांचा आधार हरपला
 
मी १९९१ ते २०११ या कालावधीत इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) मध्ये कार्यरत होतो. प्रा. नारळीकर हे त्या संस्थेचे संस्थापक संचालक होते. त्या २२ वर्षांमध्ये मला त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाचा आणि प्रोत्साहनाचा लाभ झाला. 
 
२०११ मध्ये त्यांच्या सल्ल्यानुसार मी मुंबईतील नेहरू तारांगणाच्या संचालकपदासाठी अर्ज केला. त्या वेळेस मी आयुकामध्ये स्थिरस्थानी होतो, त्यामुळे मनात संकोच होता. मात्र, त्यांनी केवळ अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले. निवडप्रक्रियेतील सहभाग अथवा पुढील कोणतीही मदत त्यांनी केली नाही. मी सात इतर उमेदवारांशी स्पर्धा करत निवड समितीसमोर अर्धा तासाहून अधिक वेळ मुलाखतीला सामोरा गेलो. नेहरू तारांगणात रुजू झाल्यानंतर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुकामध्ये मिळालेला अनुभव मला फार उपयुक्त ठरला.
 
डॉ. नारळीकर यांच्या निधनामुळे प्रत्येक विज्ञानप्रेमीला आणि विज्ञानप्रसारकांना मोठा धक्का बसला आहे. माध्यमविश्वानेही एक मोठा मित्र गमावला! 
 
- अरविंद परांजपे, संचालक, नेहरु तारांगण 

Related Articles