कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणे गरजेचे : मुख्यमंत्री   

पुणे : वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकर्‍याला सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे अ‍ॅग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांमार्फत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
पहिल्या पुणे अ‍ॅग्री हॅकॅथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानावर आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्वाचे आहे. हॅकॅथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे. जलसिंचन, पीक काढणी, पिकांवरील फवारणीचे तंत्रज्ञान, एआय कंट्रोल सेव्हर्स, कीड व्यवस्थापनात मशीन लर्निंगचा उपयोग, शेल्फ लाइफ वाढवणारे ड्रायर्स, शेतमालाचे प्राण्यांपासून संरक्षण, काढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान आदि प्रकारचे तंत्रज्ञान येथे मांडण्यात आले आहे. हे उपाय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रुपांतर करून ते बाजारापर्यंत जाण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे तयार करावीत आणि या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रुपात विकसीत करून शेतकर्‍याला लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
केंद्रीय कृषीमंत्री चौहान म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनाचे मुख्य केंद्र आहे.  शेतकर्‍यांची गरज आणि क्षमता लक्षात घेवून देशात यासाठी ९ केंद्रे उभारण्यात येतील. त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येतील. द्राक्षासाठी पुणेे, संत्र्यासाठी नागपूर आणि डाळींबासाठी सोलापूर येथे ही केंद्रे उभारण्यात येतील. त्यासाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या केंद्राच्या आधारे महाराष्ट्राचे फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कृषी वैज्ञानिक आणि शेतकर्‍यांच्या समन्वयातून नवी कृषी क्रांती शक्य असल्याचा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल, असे आवाहन केले.
 
या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक संदीप खोसला, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उप महाव्यवस्थापक संजय वाघ, नेचर ग्रुप इस्रायलचे चेतन डेडिया उपस्थित होते.

Related Articles