लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट   

मार्केटयार्डात कच्च्या लिंबाची आवक; मागणी घटली 

पुणे : मार्केट यार्डात कच्च्या आणि अपरिपक्व लिंबाची आवक वाढली आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी आहे. परिणामी, भाव जास्त मिळत होते. त्यामुळे वेळे आधीच तोडणी करून शेतकरी माल बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे कच्च्या लिंबाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यातच आता पावसाला सुरूवात झाली आहे. त्याचा फटकाही मागणीला बसत आहे. त्यामुळे आठवडाभरात लिंबाच्या भावात गोणीमागे ५०० ते ६०० रुपयांनी घट झाली असल्याची माहिती  व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
 
बाजारात रोज सुमारे २ ते अडीच हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक भागातून आवक घटल्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद येथून आवक सुरू झाली होती. ही आवकही आता घटली आहे. त्या भागातून रोज अवघी २०० ते ३०० गोणी आवक होत आहे. या पार्श्वभूमीवा स्थानिक भागातील शेतकर्‍यांकडून वेळेआधीच तोडणी करून हिरव्या रंगाचे कच्चे लिंबू बाजारात पाठविण्यात येत आहेत. या लिंबाला नेहमीपेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या बाजारात लिंबाच्या गोणीला दर्जानुसार २०० ते १ हजार रुपये भाव मिळत आहे. गोणीमध्ये १८ ते २० किलो माल असतो. मागणी घटल्यास भावात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
कच्च्या लिंबाची तोडणी करू नका 
 
जून, जुलै महिन्यात परिपक्व होणार्‍या लिंबाची तोडणी आताच होत आहे. या लिंबाला बाजारात कमी मागणी आहे. आता लिंबाची तोडणी झाल्यास पुढील महिना ते दोन महिन्याच्या कालावधीत लिंबाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्जाहिन लिंबाला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी वेळेआधी लिंबाची तोडणी करू नये. 
 
- रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी मार्केट यार्ड

Related Articles