गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस
(कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद)
 
स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपले जीवदान देणारे शचींद्रनाथ संन्याल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रतिभावंत, प्रामाणिक आणि प्रभावशाली क्रांतीकारक. सशस्त्र लढ्याबरोबरच सर्जनशील लेखणीने त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला चेतना दिली. तत्वज्ञानी आणि प्रखर राष्ट्रवादी असलेल्या शचींद्रनाथ संन्याल यांचे क्रांतीचे तत्वज्ञान अंदमान जेलमध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या ’बंदीजीवन’ या आत्मचरित्रात दिसून येते. या चरित्रात त्यांनी क्रांतीकारी विचार, राजकीय भूमिका आणि कारावासातील अनुभव प्रभावीपणे मांडले आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि इतरांचे मार्गदर्शक असलेल्या शचींद्रनाथ संन्याल यांचा धर्म, विचार या संदर्भात भगतसिंगांशी वैचारिक वाद होत. संन्याल हे भगवंतावर विश्वास ठेवणारे भक्त होते; पण त्यांचा धर्मप्रेमाचा अर्थ रुढीवाद नव्हता. भगतसिंग हे जे थीस्ट होते, त्यांनी आपल्या प्रसिद्ध व्हाय आय अ‍ॅम अन अ‍ॅथीस्ट (ुहू ख रा रप रींहळशीीं) या लेखात संन्याल यांच्या श्रद्धेबद्दल चर्चा केली आहे.
 
शचींद्रनाथ संन्याल हे भारतीय क्रांतीकारकांच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचे सेनापती. रासबिहारी बसू यांचे उजवे हात व भारतातील गदर आंदोलनाचे शचींद्रनाथ एक कर्णधार होते. बनारस षडयंंत्राच्या खटल्यात जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा होऊन त्यांना अंदमानमध्ये पाठविण्यात आले होते. चार वर्षे तेथे व्यतीत केल्यावर २० फेब्रुवारी १९२० रोजी सार्वत्रिक सरकारी क्षमादानांत त्यांची मुक्तता झाली. त्यानंतर १९२३ मध्ये त्यांनी योगेशचंद्र चटर्जी आणि पंडीत रामप्रसाद बिस्मिल यांना हाताशी धरुन ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची’ निर्मिती केली. काकोरी रेल्वेस्टेशनच्या पुढे रेल्वेवर हल्ला करून खजिना लुटण्यात आला. त्या घटनेसाठी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक म्हणून शचींद्रनाथ संन्याल आणि योगेशचंद्र चटर्जी हे तुरूंगात शिक्षा भोगत असतानाही सरकारने क्रांतीकारक चळवळीतील स्थान ओळखून दोघांनाही या प्रकरणात गोवले व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
 
शचींद्रनाथ संन्याल हे तर जन्मठेपेची शिक्षा दुसर्‍यांदा ठोठावलेले संघर्ष करणारे एकमेव स्वातंत्र्यसेनानी ठरले. पुन्हा शचींद्रनाथ संन्याल यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली. २४ ऑगस्ट १९३७ रोजी काँग्रेस मंत्रिमंडळाने त्यांची तुरूंगातून सुटका करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले. अशा प्रकारे शचींद्रनाथ संन्याल यांना दोनदा सेल्युलर तुरूंगात पाठविण्यात आले.
 
तुरुंगवासातील हाल
 
१९४१ मध्ये शचींद्रनाथ संन्याल यांना ब्रिटीश शासनाविरुद्ध जपान देशासोबत कट रचल्याबद्दल अटक झाली. ब्रिटीश शासनाने त्यांचे तुरुंगामध्ये अतोनात हाल केले. गोरखपूर तुरूंगात तिसरी कैद आणि शिक्षा भोगत असताना क्षयरोगाने ग्रस्त झाल्याने, तसेच ब्रिटेशि शासनाच्या शचींद्रनाथ संन्याल यांच्याकडे औषधोपचाराचे दुर्लक्ष केल्याने तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने त्यांचे ७ फेब्रुवारी १९४२ रोजी तुरूंगातच निधन झाले. शचींद्रनाथ कालवश झाले तरी त्यांचे बंधू जितेंद्रनाथ संन्याल हे स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होते. शचींद्रनाथ यांचा सारा परिवार स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रभागी होता. शचींद्रनाथ यांचे जीवन हे त्याग, धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.  
 
अनुशीलन समिती
 
शचींद्रनाथ संन्याल यांचा जन्म ३ जून १८९३ मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील शांतीपूर या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिनाथ संन्याल आणि आईचे नाव खेरोड वासिनी देवी. बंगाली ब्राह्मण असलेले हे कुटुंब स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होते. शिक्षण घेत असतानाच शचींद्रनाथ संन्याल यांनी १९०८ मध्येच वयाच्या पंधराव्या वर्षी क्रांतिकारी दलाचे संघटन केले होते. १९१३ मध्ये पाटना येथे त्यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली. बंगालमधील स्थानिक व्यायामशाळांमधून अनुशीलन समितीच्या अनेक शाखा निघाल्या. हिंसाचाराचे कट्टर समर्थक असलेल्या शचींद्रनाथ संन्याल यांचे ब्रिटीश सरकार, त्यांची धोरणे आणि त्यांचे एजंट यांच्याबद्दल तीव्र नापसंती होती. त्यांच्या क्रांतीकारी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ते पंजाब आणि संयुक्त प्रांतामध्ये क्रांतीकारी चळवळीचे आयोजन करण्यात गुंतले होते. रासबिहारी बोस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जाऊ लागले आणि बंगालच्या स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत असणार्‍या गटाशी ते जोडले गेले. १९१३ मध्ये रासबिहारी बोस यांच्याबरोबर त्यांचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोघांनी मिळून इंग्रज शासनाला धडा शिकविण्यासाठी आपापल्या संघटना एकत्रित केल्या.
 
१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यासाठी योग्य वेळ आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून स्वातंत्र्यचळवळ त्यांनी पुढे नेली. १९१२ मध्ये दिल्ली कटात व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात शचींद्रनाथ संन्याल यांनी अप्रत्यक्ष भूमिका बजावली. या हल्ल्यात हार्डिंग्ज जखमी झाले; पण लेडी हार्डिंग्ज सुरक्षित होत्या. व्हाईसरॉय चेम्सफोर्डनंतर हार्डिंग्जने सत्ता सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत १९१५ मध्ये बंगालमध्ये हार्डिंग्ज रेल्वे पूल बांधण्यात आला. हार्डिंग्जमुळे पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी ब्रिटनला भारतीय सैन्य मिळाले. गदर संघटनेच्या माध्यमातून २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतभर उठाव करण्याचे निश्चित झाले. २१ फेब्रुवारी १९१५ रोजी काहीच न आढळल्यामुळे संध्याकाळी शचींद्रनाथ रेल्वे स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी पायोनियरचा अंक उघडताच फसलेल्या उठावाची परिपूर्ण कल्पना त्यांना आली. तोपर्यंत रासबिहारी बोस बनारसला पोहोचले होते. तिथून त्यांनी जपानला गुप्तपणे प्रयाण केले. त्यासाठी संन्याल, नागेंद्रनाथ दत्त उपाख्य गिरीजाबाबू यांनी बंगालच्या प्रसिद्ध डाका अनुशीलन समितीच्या वतीने सर्व खर्च करीत रासबिहारी बोस यांना जपानला पाठविले. त्यावेळी शचींद्रनाथ संन्याल यांना रासबिहारी म्हणाले, ‘देश सोडताना मला अतिशय दुःख होत आहे. पक्ष संघटन करून तुही माझ्याजवळ ये. १९१५ च्या एप्रिल महिन्यातील एका दुपारी शचींद्रनाथ व गिरीजाबाबू रासबिहारी यांना जपानकडे जाणार्‍या एका जहाजात बसवून आले. ते गेल्यानंतर शेठ दामोदर स्वरूप यांच्या विश्वासघातामुळे २६ जून १९१५ ला शचींद्रनाथ संन्याल व गिरिजाबाबू यांना पकडून त्यांच्यावर बनारस षडयंत्राचा खटला सरकारला उभारता आला. या खटल्यात शचींद्रनाथ यांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा झाली. दामोदर शेठने गुप्तपणे सरकारला बातमी पुरविली तरी कोर्टात उघड साक्ष देण्यास नकार दिल्याने चिडून सरकारने त्यांच्यावर खटला चालवून त्यालाही शिक्षा दिलीच. शचींद्रनाथ यांचे बनारसमधील त्यांचे घर जप्त करण्यात आले.
 
अत्याचाराविरुद्ध लढा
 
फेब्रुवारी १९१६ मध्ये अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगण्यास गेल्यानंतर त्यांनी तिथे स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांवर अमानवीय होत असलेल्या अत्याचाराबद्दल मोठा उठाव केला. काँग्रेसचे त्यावेळचे दिग्गज नेते लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत त्यांनी हे सर्व होत असलेले अन्यायपूर्ण अत्याचाराच्या बाबी पोहोचवल्या. २० फेब्रुवारी १९२० रोजी त्यांची सुटका करण्यात आली. शचींद्रनाथ संन्याल यांनी गदर संघटनेच्या १९१५ च्या भारतातील अयशस्वी उठावाची तीन कारणे सांगितली. एक म्हणजे युरोप व अमेरिकेतील भारतीय क्रांतीनेत्यांनी युद्धपूर्व काळातच इंग्रजांचे जर्मनादि शत्रू ओळखून त्यांच्याशी तुल्यारी मित्रसंधीच्या सूत्राने योग्य संबंध प्रस्थापित न करणे. दुसरे म्हणजे युद्धपूर्व काळांत समर्थ नेतृत्वाखाली सुसुत्र संघटनेचा अभाव आणि तिसरे महत्वाचे म्हणजे युद्धारंभानंतर एक वर्ष प्रवास मोकळा असतानाही भारतात शस्त्रें व लोक पाठविण्याची कोणतीही योजना नसणे. इंग्रज सावध होऊन नाकेबंदी झाल्यावर पुढे होणारा विचका स्वाभाविकच होता. शचींद्रनाथ संन्याल आणि हसत हसत फाशीवर गेलेले स्वातंत्र्यसेनानी विष्णु पिंगळे यांची शेवटची भेट जानेवारी १९१५ मध्ये झाली. शचींद्रनाथ पिंगळे त्यांच्याविषयी लिहिताना म्हणतात... तो भेटणार नाही, असे मला अगोदर समजले असते, तर लाख आग्रह केल्यावरही मी त्याला आपल्यापासून जाऊ दिले नसते. तो सुदृढ, बळकट व गोरापान मराठा युवक, ’मी वीर सैनिकांप्रमाणे फक्त कार्य करणे जाणतो’ असे म्हणत असे. त्याचे ते शब्द माझ्या कानात अजून घुमतात. त्याच्या तीव्र बुद्धीची ओळख पटविणारे त्याचे तेजस्वी टपोरे डोळे विसरता येत नाहीत.
 
या अपयशानंतर स्वातंत्र्याच्या रणाचा यज्ञाग्नि पुनश्च 
गर्जुन उठला.
विश्वाचिया अखिल मंगल धारणाला | 
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला ॥
क्रांती पक्षाची स्थापना
 
यज्ञाग्नीचे हे आवाहन भारतीय क्रांतीयोद्ध्यांनी नाकारले नाही. एवढ्या मोठ्या अपयशानंतर नैराश्य येणे स्वाभाविक होते. सार्वजनिक सभेच्या सत्रात अंदमानातून सुटलेले शचींद्रनाथ संन्याल यांनी रासबिहारी बसूंना ही नैराश्याची भावना जपानला कळविली होती. १२/४/१९२२ रोजी टोकियोहून या पत्राला पाठविलेल्या उत्तरांत रासबिहारी लिहितात ख वळव पेीं श्रळज्ञश ींहश ीेंपश ेष शिीीळाळीा ींहरीं र्शिीींरवशव ीेाश रिीीीं ेष..... ङशीींंशी. ढहशीश ळी शींशीपरश्र श्रळषश, ीे ुेीज्ञ ळी शींशीपरश्र. या महान क्रांतिसेनानीच्या भावनेला साद देत शचींद्रनाथ संन्याल आणि कानपुरला ’रायसाहेब’ या गुप्त नावाने कार्य करीत असलेल्या योगेशचंद्र चटर्जी यांनी उचल घेऊन अनुशीलन समिती आणि आपला पक्ष यांच्यांत पूर्ण एकात्मता प्रस्थापित करून ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या नावाने नवीन क्रांती पक्षाची प्रतिष्ठापना केली. कामकरी व शेतकर्‍यांना अधिकार देऊन शोषणहीन राज्यपद्धतीचा या पक्षाच्या घटनेत पुरस्कार करण्यात आला. या असोसिएशनच्या शाखा उत्तर भारतांतील प्रत्येक प्रांतातून काढण्याचा प्रयत्न झाला होता. संयुक्त प्रांताच्या शाखेचे पंडित रामप्रसाद बिस्मिल, सुरेशचंद्र भट्टाचार्य, विष्णु शरण दुबलिस व राजेंद्र लादिडी हे प्रमुख होते. संस्थेचे एक प्रमुख कार्यकर्ते मन्मयनाथ गुप्त यांच्या संपादकत्वाखाली ’अग्रदूत’ या नावाची एक गुप्त पत्रिकाही निघत असे.
 
१९२५ च्या जानेवारी महिन्यांत या संस्थेच्या वतीने ठर्शीेंर्श्रीींळेपरीू या नावाने एक पत्रक सार्‍या हिंदुस्थानभर एकाच दिवशी वाटण्यात आले होते. या पत्रकाच्या सूत्रबद्ध प्रचाराने राजसत्तेला कल्पना येऊन तिची निद्रा खाडकन भंगली. लेखकाचा शोध लवकरच लागला. शचींद्रनाथ यांनी पत्रकाची एक प्रत आपल्या पत्रासह जपानमध्ये असलेल्या रासबिहारी बसू यांना पाठविली. ते पत्र मध्येच पकडले जाऊन त्याच्या आधारे शचींद्रनाथ यांच्यावर खटला होऊन त्यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली. तुरूंगात असतानाच लखनौ येथील काकोरी कट प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आणि ६ एप्रिल १९२७ रोजी लखनौ येथील विशेष सत्र न्यायाधीशांनी त्यांना जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. १९३७ मध्ये सुटका झाल्यावर पुन्हा जपान देशाशी संबंध ठेऊन इंग्रजांविरुद्ध कट करण्याचे प्रयत्न केल्याबद्दल कैदेत ठेवले. या ठिकाणी त्यांचा क्षय आजाराने मृत्यू झाला. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या या खंबीर नेत्याचे बंदीजीवन हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे.

Related Articles