शस्त्रसंधीनंतर देशातील ३२ विमानतळांची सेवा पूर्ववत   

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेसाठी देशातील ३२ विमानतळ काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागे कारण देखील तसेच होते. पाकिस्तानकडून सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी ड्रोन हल्ले करण्यात आले. तसेच सीमाभागात बऱ्याच ठिकाणी गोळीबार झाला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. 
 
पाकिस्तानने भारतीय हवाईतळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. याउलट भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले. दोन्ही देशांमध्ये ताणले गेलेले संबंध पाहता भारताने प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ३२ विमानतळांची नागरी सेवा बंद केली होती. 
 
भारत-पाकिस्तान यांच्यात सलग तीन-चार दिवस संघर्ष बघायला मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात झाला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे आवाहन करण्यात आले. भारताने त्यासाठी काही अटी ठेवल्या. भारताच्या अटीशर्ती मंजूर करत दोन्ही देशांचा शस्त्रसंधीबाबत निर्णय घेण्यात आला. यानंतर आज दोन्ही देशांच्या DGMO ची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर आता केंद्र सरकारने नागरी विमान वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबत महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३२ विमानतळांची नागरी वाहतूक सेवा १५ मे २०२५ च्या सकाळी साडेपाच वाजेपर्यंत तात्पपुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थिती निवळली आहे. सारे काही पूर्वपदावर येत असल्याने केंद्र सरकारने ३२ विमानतळांवरची नागरी वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानतळे आता तात्काळ प्रभावाने नागरी विमान सेवांसाठी उपलब्ध आहेत, असे कळविण्यात आले आहे. प्रवाशांना एअरलाइन्सशी थेट फ्लाइटची स्थिती तपासण्याची आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.

'या' ३२ विमानतळांवरची सेवा पूर्वपदावर

१ जैसलमेर
२ जामनगर
३ जोधपूर
४ अधमपूर
५ अंबाला
६ अवंतीपूर
७ भटिंडा
८ भुज
९ बिकानेर
१० हलवारा
११ हिंडन
१२ जम्मू
१३ कांडला
१४ कांगडा (गग्गल)
१५ केशोद
१६ किशनगड
१७ कुल्लू मनाली (भुंतर)
१८ लेह
१९ लुधियाना
२० मुंद्रा
२१ नाल्या
२२ पठाणकोट
२३ पटियाला
२४ पोरबंदर
२५ राजकोट (हिरासर)
२६ सरसावा
२७ शिमला
२८ थॉइस
२९ उत्तरलाई
३० चंदीगड
३१ श्रीनगर
३२ अमृतसर
 

Related Articles