विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे   

भावार्थ रामायणातील कथा : विलास सूर्यकांत अत्रे 

विश्वामित्रांच्या मदतीला आणि त्यांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राम आणि लक्ष्मण त्याच्या सोबत निघाले. राम, लक्ष्मण रथात अरूढ होत असताना, पुत्रांच्या काळजीमुळे दशरथ विश्वामित्रांपाशी गेला, त्यांना विनवणी केली. त्यांच्या पुढे हात जोडले. अतिशय भावनाशील होत तो विश्वामित्रांना म्हणाला, ‘हे महर्षि तुमच्या सोबत मी केवळ माझे पुत्र देत नाही, तर माझे प्राणच देत आहे. त्यांना सांभाळावे‘. दशरथाच्या मनात राम-लक्ष्मणासाठी जी काळजी होती, ती वसिष्ठांना नव्हती; पण त्यांच्या मनातही रामाबद्दलच विचार चाललेले होते. ते   विश्वामित्रांना म्हणाले, ‘हे विश्वामित्रा राम जरी अवतारी पुरूष असला तरी गुरूकडून ज्ञान प्राप्त होणे गरजेचे असते, ते चिरंतन असते. तूही रामाला शिष्य करून घे, तुही त्याचा गुरू हो. तू तुझी धनुर्विद्या रामाला शिकव आणि माझ्या प्रमाणे सूर्यकुळाच्या गुरूपदाचा बहुमान तुलाही लाभो.‘
 
रामाचे गुरू वसिष्ठ असताना आपण त्याचे गुरू व्हावे आणि सूर्यकुळाच्या गुरूपदाचा मान मिळवावा असे वागणे यथोचित नाही, असे विश्वामित्रांना वाटत होते; मात्र विश्वामित्रांच्या मनात रामाला धनुर्विद्या द्यावी असेही होते. वसिष्ठांनी  तेच सुचविल्यामुळे विश्वामित्रांना मनोमनी आनंद झाला. विश्वामित्रांनी रामाला धनुर्विद्या शिकविण्याचे कबूल केले. विश्वामित्र, राम, लक्ष्मण रथावर आरूढ होताना त्यांना अनेक शुभ शकून झाले. वाटेवर प्रसन्न वदन असलेले द्विज दिसले, पाण्याचे कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया दिसल्या. दूध दही कलशात वाहून नेणार्‍या गौळणी दिसल्या. भारद्वाज, तसेच कावळे उजवीकडून डावीकडे उडत जाताना दिसले. तासपक्षी डावीकडून उजवीकडे उडत जाताना दिसले. विश्वामित्रांचे मनोरथ पूर्ण होतील, राम रणांगणावर विजयी होईल, राक्षसांचा  नाश करेल, असा त्या सर्व शुभशकुनांचा अर्थ वसिष्ठांनी सांगितला. 
 
अयोध्येपासून सहा कोस अंतरावर शरयू नदीच्या काठी कामाश्रम नावाचा आश्रम होता. ते तिघे अयोध्येवरून निघाले आणि या कामाश्रमात मुक्कामाला थांबले. या आश्रमात येणार्‍या सगळ्यांच्या कामना सिद्धीस जातात म्हणून त्या आश्रमाचे नाव कामाश्रम. आपल्याही सगळ्या कामना सिद्धीस जाव्यात म्हणूनच विश्वामित्राने तिथे मुक्कामाचे ठरविले होते. विश्वामित्रांनी पहाटे पहाटे राम-लक्ष्मण यांना उठविले. अन्हीक स्नान संध्या उरकायला सांगितले. त्यानंतर राम लक्ष्मणाकडून त्यांनी गायत्री मंत्राचे आवर्तन करून घेतले. धनुर्विद्या शिकण्यासाठी धनुष्य बाणासह तयार होण्यास सांगितले. विश्वामित्रांना वंदन करून राम, लक्ष्मण त्याप्रमाणे तयार झाले. विश्वामित्रांनी त्यांना आशीर्वाद देत धनुर्विद्येचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांना मंत्रविद्याही शिकविली होती. राम, लक्ष्मण यांची ग्रहण शक्ती आणि प्रगती पाहून विश्वामित्रांनी कौतुकाने प्रेमभावाने त्यांची पाठ थोपटली.
 
विश्वामित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी पुढे प्रयाण केले. शरयू आणि गंगानदी यांच्या संगमावर दुसरा मुक्काम केला. सकाळी उठून नित्यकर्म करून त्यांनी नावेने पैलतीर गाठले. पैलतीराला ते उतरले तर पुढे त्राटिका वन पसरलेले होते. वन कसले भयंकर भीतीदायक असे घोर अरण्यच ते होते. क्रूर श्वापदांनी ते व्यापलेले होते. घुबडांच्या घुघुत्काराने ते रान गजबजले होते. कोल्ह्यांची कोल्हेकुई कानावर पडत होती. दिवसासुद्धा अंधार पडावा इतकी दाट झाडी होती. मनुष्याचा मागमुसही त्या वनात लागत नव्हता. हे वन मनुष्यवस्ती नसलेले, जंगली प्राण्यांचा वावर असलेले, कुणालाही भीती वाटेल असे होते. ते असे का आहे म्हणून रामाने विश्वामित्रांना विचारले असता विश्वामित्रांनी त्याची कथा सांगितली. ‘त्राटिका नावाची राक्षसीण या वनात राहाते. म्हणून या वनाला त्राटिकावन असे म्हणतात. इथे जवळच तिचे घर आहे. ती भयंकर आक्राळ-विक्राळ आहे. ती दुष्ट आहे. ती या वनातून जाणार्‍या येणार्‍या माणसांना पकडते, त्यांना ठार करते. त्यामुळे या वनातून कोणीही प्राणभयाने जात येत नाहीत. तिच्यामुळे इथले मालव, केशिक, कारूष हे देश ओसाड झाले आहेत.ही त्राटिका कोण, ती राक्षसीण का झाली, रामाच्या मनात तिच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्याला त्राटिकेचा पूर्व इतिहास जाणून घ्यायची इच्छा झाली. त्याने उत्सुकतेने विश्वामित्रांना त्याबद्दल विचारले असता, विश्वामित्रांनी  रामाला त्राटिकेची कथा सांगितली. 

त्राटिकेची कथा

’सुकेतु नावाचा एक यक्ष होता. त्याला मुलबाळ नव्हते. अपत्य प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाचे अनुष्ठान केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाने त्याला वर मागायला सांगितला असता, सुकेतुने ब्रह्मदेवाकडे पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की, त्याच्या नशिबात पुत्र योग नव्हता; मात्र  हजारो हत्तींचे बळ असलेल्या कन्येचा योग आहे. सुकेतु यक्षाची कन्या ती ही त्राटिका. 
 
सुंद आणि उपसुंद नावाचे दोघे राक्षस बंधू होते. त्यातला सुंद थोरला तर उपसुंद धाकटा भाऊ होता. सुंदचे लग्न त्राटिकेशी झाले. त्यांना दोन मुले झाली. एकाचे नाव मारीच आणि दुसर्‍याचे नाव सुबाहू. सुंद आणि उपसुंद हे राक्षसबंधू महापराक्रमी होते; मात्र आपल्या शक्तीचा त्यांना माज होता. देवाधिकांना त्यांनी वेठीला धरले होते. त्यांचा जाच असह्य होता. त्यांचे पारिपत्य व्हावे असे सर्व देवाधिदेवांना वाटू लागले होते. त्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सर्व देवाधिदेव ब्रह्मदेवाला शरण गेले. सुंद आणि उपसुंद यांचे पारिपत्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने एक युक्ती केली. त्याने तिलोत्तमा नावाची अप्सरा सुंद आणि उपसुंद यांच्या राज्यात पाठवून दिली. तिलोत्तमा दिसायला अतिशय सुंदर होती. तिच्या एका कटाक्षाने सुंद आणि उपसुंद दोघेही घायाळ झाले. त्या सुंद आणि उपसुंद दोघांनाही तिच्या प्राप्तीची अभिलाषा निर्माण झाली. ती आपलीच व्हावी असे दोघांना वाटले. ती कुणाची यावरून त्या दोघात बोलणी सुरू झाली. 
 
‘हिला तू धाकट्या भावाची पत्नी म्हणून भावजय मानावेस‘ असे उपसुंदाने सुंदाला सांगितले. त्यावर ‘अरे मोठ्या भावाची पत्नी असे तू तिला समज‘ असे सुंद उपसुंदाला म्हणाला. ‘थोरल्याने लहानाचे लाड पुरवायचे असतात, तू माझे लाड पुरव‘ उपसुंदाने सुंदाला भावनिक साद घातली, तर ‘अरे धाकट्याने थोरल्याची आज्ञा पाळायची असते‘ असा आपला अधिकार गाजवत सुंद उपसुंदाला म्हणाला. ‘धाकट्याने जिला पत्नी म्हणून स्वीकारले आहे तिला थोरल्याने भावजय मानावे‘ उपसुंदानेही आपला हक्क बजावण्याचा प्रयत्न केला. सुंदाने त्यावर कडी करत ‘अरे थोरल्याची जी पत्नी तिला धाकट्याने आई मानावे‘ असेे उत्तर दिले. शब्दांनी शब्द वाढत गेले. दोघेही तिलोत्तमेच्या प्राप्तीसाठी वेडे झाले होते. शब्दांना धार येऊ लागली आणि धारदार शब्दांच्या जागी दोघांच्याही हातात गदा कधी आली हे त्यांनाही कळले नव्हते. तिलोत्तमेच्या प्राप्तीसाठी त्यांचे आपापसात गदायुद्ध सुरू झाले. युद्धात दोघांचे घाव एकमेकांच्या वर्मी लागले. त्याची परिणिती दोघांचे प्राण गमावण्यात झाली. सुंद आणि उपसुंद यांच्यापासून देवाधिदेवांना मुक्ती मिळाली होती. तेव्हापासून स्त्री किंवा संपत्तीवरून भावाभावात होणार्‍या भांडणाला सुंदोपसुंदी असे म्हणू लागले. सुंद आणि उपसुंद यांनी आपापसात युद्ध करून आपला विनाश करून घेतला होता. 
 
त्राटिका त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळ राहू लागली. तिच्या अंगात असलेल्या बळामुळे ती अगस्ती ऋषींना त्रास देऊ लागली. तेव्हा अगस्ती ऋषींनी तिला शाप दिला की, तू आणि तुझी दोनही मुले आक्राळ-विक्राळ असे राक्षसच होऊन राहतील. त्यामुळे त्राटिका, मारीच आणि सुबाहू यांना राक्षसाचे रूप प्राप्त झाले. हजार हत्तीचे बळ असल्यामुळे ती अतिशय भयानक, आक्राळ विक्राळ, क्रूर राक्षसी झाली. तेव्हापासून त्राटिका या वनात राहू लागली आणि त्यामुळे सारा परिसर 

भितीदायक झाला.

विश्वामित्रांनी त्राटिकेची संपूर्ण कथा रामाला सांगितली आणि नंतर ते रामाला म्हणाले, ‘आपण ही वाट सोडून दुसर्‍या वाटेने जाऊयात असे विश्वामित्र रामाला म्हणू लागले. त्यावर राम म्हणाला की, ‘जर या त्राटिकेपासून मी तुमचे रक्षण करू शकलो नाही, तर तुमच्या यज्ञाचे रक्षण मी कसे करू शकेन? आता याच वाटेने आपण पुढे जाऊयात त्राटिका काय करते ते पाहू.‘ विश्वामित्रांना रामाकडून याच उत्तराची अपेक्षा होती. रामाच्या धैर्य, बळ, शक्ती आणि शांती या गुणांनी ते सुखावून गेले.श्रीरामाला पाहताच त्याला गिळण्यासाठी त्राटिका विक्राळ मुख पसरून समोरून रामाच्या अंगावर धावून आली. तिला येताना पाहून रामाने विश्वामित्रांना नमन केले आणि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून त्राटिकेला बाण मारला. त्या एकाच बाणाने त्राटिकेचा विनाश झाला. त्राटिकेचा वध करून श्रीरामाने त्राटिका वन भयमुक्त केले.  
 

Related Articles