दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत   

पुतीन यांनी साधला मोदींशी संवाद

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. तसेच, पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दहशतवादाविरोधातील लढ्यात रशिया भारतासोबत उभा आहे, असेही ते म्हणाले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देश दहशतवादाविरोधात भारतासोबत उभे राहिले आहेत. आता रशियाचीदेखील साथ मिळाली आहे.दरम्यान, पुतीन यांनी मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. भारत आणि रशियात दरवर्षी शिखर परिषद बैठक होत असते. या बैठकीस पुतीन उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेत्यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला.पुतीन यांनी भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे,असे क्रेमलिनने एका निवेदनात म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी रशिया-भारत संबंधांच्या धोरणात्मक स्वरूपावर भर दिला, असेही यात नमूद केले आहे.
 
पुतीन यांनी पंतप्रधानांशी दूरध्वनीवर संवाद साधताना पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच, दहशतवादाविरोधातील लढ्यात पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी रशिया भारतासोबत उभा आहे, असेही पुतीन यांनी सांगितले.या हल्ल्यामागील दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायासमोर आणलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर केली.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये एका परदेशी पर्यटकासह दोन स्थानिकांचा समावेश होता. तर, अन्य २३ विविध राज्यांतून पर्यटनासाठी आले होते.
 
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पहलगाम हल्ल्याचा अमेरिकासह अनेक देशांनी निषेध केला आहे.भारताच्या कारवाईने पाकिस्तान धास्तावला असून तो विविध देशांकडे मदतीची याचना करत आहे. पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्रांव्यतिरिक्त अन्य कोणी पाठिंबा दिलेला नाही.
 

Related Articles