जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर   

रथाला ४८ वर्षांनंतर नवी चाके, कोलकात्यात होणार प्रथमच उपयोग

कोलकाता : कोलकात्यातील भगवान जगन्नाथांच्या रथाला ४८ वर्षांनंतर नवी चाके मिळाली असून, तीही थेट रशियाच्या ‘सुखोई’ या लढाऊ विमानासाठी वापरलेली! ताशी २८० किलोमीटर वेगाने उड्डाण करणाऱ्या या लढाऊ विमानाचे टायर आता पारंपरिक रथयात्रेसाठी वापरले जाणार आहेत. भारतातील पुरातन आणि ‘जुगाडू’ संस्कृतीचे एक विलक्षण उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जाते.
 
गेल्या वर्षी प्रथमच ‘इस्कॉन’च्या रथाच्या चाकासाठी टायरची अडचण उद्भवली. त्यावर मात करण्यासाठी इस्कॉनने तातडीने नवीन चाकांसाठी प्रयत्न सुरू केले. यापूर्वी, या रथासाठी ‘बोइंग’ विमानांचे टायर वापरले जात होते. मात्र, आता ते मिळणे अवघड झाल्यामुळे सुखोई विमानांचे टायर निवडण्याचा पर्याय निवडला गेला.
 
‘सुखोईसाठी टायरची निर्मिती करणाऱ्या ‘एमआरएफ’ कंपनीला रथासाठी टायर देण्याची मागणी आम्ही केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही त्यांची चेष्टा करत आहोत, असेच त्यांना वाटले. मात्र, नंतर आम्ही टायरचे कोटेशन मागितल्यावर कंपनीने सुखोईचेच टायर हवे का आणि कशासाठी अशी विचारणा केली,’ अशी माहिती कोलकात्यातील इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी दिली.

का बदलण्यात आले टायर?

जुने टायर मागील ५० वर्षांहून अधिक काळ वापरले जात होते. हे टायर ‘बोइंग बी ७४७’ विमानाचे होते. आता हे विमानच सेवेतूनच बाद झाल्यामुळे, त्याचे टायर उपलब्ध होणे कठीण झाले होते.
 
‘सुखोई’च्या टायरचा व्यास सुमारे चार फूट असून, ते जंबो जेटच्या टायरच्या आकाराइतके आहे. या टायरचे वजन ११० किलो आहे.
 
पूर्वी ‘बोइंग बी ७४७’ विमानासाठी ‘डनलॉप’ कंपनी टायर तयार करीत असे.
 
सध्या ‘सुखोई’च्या टायरची निर्मिती भारतातील ‘एमआरएफ’ ही कंपनी करते.

'सुखोई 'च्या टायरमुळे रथ स्थिर राहणार

नवीन' सुखोई' टायरमुळे रथ चालवणे अधिक सोपे होणार आहे.
 
हे टायर अधिक सुरक्षित असतील आणि त्यामुळे रथ स्थिर राहण्यास मदत होईल.
 
कोलकात्याच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी ट्रामच्या पट्टचा असल्यामुळे हे टायर फार उपयुक्त ठरतील.
 
या टायरमुळे रथ ओढणाऱ्या भक्तांची मेहनतही कमी होईल.
 
२७ जूनपासून सुरू होणाऱ्या रथयात्रेदरम्यान तांत्रिक बिघाड होण्याची शक्यतादेखील कमी होईल.
 

Related Articles