वाचक लिहितात   

एक तरी वारी अनुभवावी!

‘जरी या जगाचा असे बाप देवा, आम्हा लेकरांची विठू माऊली’ अशा श्रद्धेच्या अथांग सागराचे प्रतिक असलेल्या विठूरायाची वारी  सुरू झाली आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा असून आषाढ शुक्ल एकादशीला पंढरपूरमध्ये या वारीचे समारोपाचे औचित्य साधले जाते.दरवर्षी लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात. अशा या निघणार्‍या ’पंढरपूर वारी’ला जुनी परंपरा लाभलेली आहे. वारकर्‍यांचा श्वास असलेल्या पंढरपूरच्या वारीची महती सांगावी तितकी कमीच आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. विठ्ठलाला भेटण्यासाठी पद, पैसा या गोष्टी महत्वाच्या नसून फक्त अंतर्मनातील भाव महत्वाचा असतो. विठूरायाला भेटायची आस आणि मुखी विठ्ठल नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. आषाढी एकादशी व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी उपवास केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते.
 
वर्षभरात येणार्‍या एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी महत्त्वाच्या मानल्या जातात. या काळात व्रतं, उपवास, भजन-कीर्तन करण्याची पद्धत पाडली असावी. त्याचबरोबर या काळात पावसाळा असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेताने आहार घेणे केव्हाही उत्तमच. म्हणूनच पचायला जड असे पदार्थ टाळून उपवासाची परंपरा पडली असावी. समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. वारीत विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होतात. या ’पंढरीच्या वारी’त सामील होणारे सगळे ’वारकरी’ असतात. सगळे वारकरी भेदभाव विसरून वारीत सामील होतात. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. आषाढी एकादशीला महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. भक्तिरसात चिंब होतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता सुरु असलेला आणि राज्यातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा बनलेला पंढरीतील पालखी सोहळा (वारी) साकारत आहे. दरवर्षी वारी पाहण्यासाठी अनेक विदेशी नागरिक पंढरीची वारी करतात. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला सुमारे दहा लाखाच्या घरातील हा शिस्तबद्ध सोहळा जगातील एक आश्चर्य आहे.
 
प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (जि. सांगली) 
 
बेरोजगारांच्या संख्येत वाढ
 
कोणतीच नोकरी व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन नसल्याने सुमारे ७१.७ लाख बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी केली असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणीतून समोर आले आहे. सन २०२४ मध्ये याच केंद्रात सुमारे १०.२१ लाख तरुण-तरुणींनी नोंदणी केली असल्याची आकडेवारी सांगते. २०२४च्या आकडेवारीनुसार माध्यमिक शालांत परीक्षेपेक्षा कमी शिक्षण झालेल्या स्त्रियांची ४३८,६३४ ही संख्या धरून १८ लाख ९७१ जणांनी नोंदणी केली आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४००,९३९ स्त्रियांची संख्या धरून १४,४७,८१३ जणांनी व बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १५,५७,३०० जणांनी नोंदणी केली आहे. सुमारे १५ लाखांहून अधिक बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरी व्यवसायासाठी आपली नावे नोंदविली आहेत. यावरून राज्यात बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी व्यवसायाची गरज असल्याचे दिसते; मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे आणि पात्रतेनुसार नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. सन २०२३ व २०२४ मध्ये काही रिक्त पदे भरण्यात आली; परंतु कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात नोंदणी झालेली बेरोजगारांची संख्या, अधिसूचित केलेली रिक्त पदे आणि प्रत्यक्षात भरलेल्या पदांच्या संख्येत तफावत दिसून येते. रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काय कारणे असावीत हे समजणे कठीण आहे. रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करणार, की नाही किंवा भरती प्रक्रिया केव्हा सुरू केली जाईल हे समजणे कठीण आहे.
 
राजन पांजरी, जोगेश्वरी 
 
संरक्षक जाळ्या बसवा
 
दरवर्षी येणार्‍या पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होऊन जाते. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते; पण अनेक समस्यांबरोबर उघड्या गटारीच्या आणि त्यामुळे होणार्‍या जीवघेण्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर येतो. मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मिळून अंदाजे एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत; परंतु त्यापैकी अद्याप ५० टक्के मॅनहोलवर जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत, असे वास्तव समोर आले आहे. संपूर्ण पावसाळा अजून बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडू नये म्हणून जीवघेणे उघडे मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी तातडीने बंद करणे आवश्यक आहे. दुसरीकडे मॅनहोलवरच्या संरक्षक जाळ्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
सामाजिक न्यायाचे पाऊल
 
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे आयोगाला स्वतंत्र अधिकार, कार्यक्षमता, आणि अधिकृतता प्राप्त होणार असून अनुसूचित जातीच्या हितसंबंधांचे संरक्षण, त्यांच्या समस्यांचे निराकरण आणि त्यांच्यावरील अन्यायाच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे. आयोगाला वैधानिक दर्जा दिल्यानंतर तो न्यायायलीन चौकशी, तक्रार नोंदणी, शिफारसी आणि शासनाला जबाबदार ठरवू शकेल. हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने टाकलेले ऐतिहासिक पाऊल म्हणावे लागेल. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे.
 
अंधश्रद्धेला खतपाणी
 
’ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट - विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरवणार्‍या पुणे शहर उपनगर चिंचवड परिसरात एका वृक्षातून जलधारा बाहेर पडली. यास दैवी चमत्कार समजून काही सश्रद्ध नागरिकांनी यास ’अमृतधारा’ समजून सदर वृक्षांची हार घालून; हळद - कुंकू लावून पूजा केली. तथापि सदर वृक्षाखालून पाण्याची पाईप लाईन गेली असून ती फुटली आणि कालौघात झाडाचे खोड पोखरले गेल्याने हे पाणी वृक्षाच्या खोडातून बाहेर पडले असल्याचे वास्तव तपासांती समोर आले. घटनेमागील कार्यकारण भाव समजून न घेता त्यास दैवी चमत्कार समजण्याचा आपल्या समाजात प्रघात आहेच. मध्यंतरी शिर्डीत काही श्रद्धाळू साई भक्तांना साईबाबांची प्रतिमा भिंतींवर प्रकट झाल्याचा साक्षात्कार झाला होता नंतर तो ’भास’ असल्याचे समोर आले. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या अशा गोष्टी घडत असतात. त्यातूनच समाजात ’अनुकरण करणार्‍यांचा कळप’ निर्माण झाला आहे. 
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
पंढरपुरात स्वच्छतेला महत्त्व हवे
 
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. पंढरपूरला मोठ्या प्रमाणात आषाढी वारीसाठी भाविक येतात. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता महत्त्वाची असते. त्याच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन नेहमीच प्रयत्न करीत असते; मात्र भक्तांची संख्या मोठी असल्याने स्वच्छतेवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. त्यामुळे प्रत्येक भाविकांनी स्वतःपासूनच स्वच्छतेला महत्त्व देऊन तेथे घाणीचे साम्राज्य होणार नाही, याची काळजी घ्यावी.
 
राजू जाधव, मांगूर जि.बेळगांव

Related Articles