मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी   

५५२ ठिकाणी दरडी कोसळल्या; १५२ घरांचे नुकसान

ऐझॉल : मिझोराममध्ये मागील दहा दिवसांत मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये पाच जणांचा बळी गेला, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने मंगळवारी दिली.पावसानंतर अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तर, ५५२ ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. पावसामुळे १५२ घरांचे नुकसान झाले. दरड कोसळल्याने किंवा घरांना तडे गेल्याने १९८ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. तर, ९२ जणांना पुरामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
 
राज्यात ११ जिल्हे आहेत. म्यानमारच्या सीमेवरील चंपाई जिल्ह्यास पावसाचा मोठा फटका बसला आहे. यात तीन जणांना प्राण गमवावे लागले. तर, २०९ ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात ९ घरांचे मोठे नुकसान झाले तर १४ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.सेरछिप जिल्ह्यात पावसाने एकाचा बळी घेलला. जिल्ह्यात ७५ ठिकाणी दरड कोसळली. तर, २७ घरांचे नुकसान झाले. १३२ कुटुंबांना घरांना भेगा पडल्याने किंवा दरड कोसळल्याने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.मागील तीन दिवसांत ऐझॉल जिल्ह्यात २५३.८ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

चार दिवसांपासून दहा जिल्ह्यांतील शाळा बंद

राज्यातील दहा जिल्ह्यांतील शाळा चार दिवसांपासून बंद आहेत. सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून सैतुआल वगळता सर्व जिल्हा प्रशासनाने मंगळवारी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. ऐझॉलचे उपायुक्त आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लालहरियारपुइता यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मुसळधार पावसामुळे २९, ३० मे आणि २ जून रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मिझोराममध्ये २४ मे पासून पाऊस पडत असून ३० मे पासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत. 
 

Related Articles