रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!   

अभिजित अकोळकर

राज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर हजारो शिवभक्त नतमस्तक

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप... या ओळी रायगड पाहिल्यानंतर अतिशय चपखल बसतात. एक अभेद्य किल्ला आणि सह्याद्रीच्या कडेकपारित नियोजनपूर्वक केलेली त्याची निवड याचे यथार्थ दर्शन म्हणजे रायगड. रायगड एक पर्यटन स्थळ नव्हे, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा नुकताच झाला. यानंतरही पर्यटकांचा ओघ किल्ल्यावर सुरूच आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर थाटात पार पडला. प्रथम तारखेनुसार आणि नंतर तिथीनुसार सोहळा झाला. या दोन्ही सोहळ्यानंतर रायगडावर पर्यटकांचा ओघ सुरू आहे. आठवड्याभरात हजारो पर्यटकांनी रायगडाला भेट दिली आहे. 
 
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप... या ओळी रायगड पाहिल्यानंतर अतिशय चपखल बसतात. एक अभेद्य किल्ला आणि सह्याद्रीच्या कडेकपारित राजधानी म्हणून त्याची केलेली निवड ही छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी किती होती, याची प्रचिती येते. रायगड स्वराज्याची राजधानी असल्याने त्याकडे पर्यटकांची पावले वळतात हे निश्चितच. महाराजांचे गड आणि किल्ले हे पराक्रम, शौर्य आणि प्रेरणा देणारे आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही चिवटपणे झुंज कशी द्यायची? याचे मार्गदर्शक आहेत.

रायगड पर्यटकांना खुणावतो...

रायगडाचे पूर्वीचे नाव ’रायरी’. सह्याद्री पर्वताच्या रांगांमधील हा अतिभव्य दुर्ग असला तरी तो सह्याद्रीतील एकही कड्याशी जोडलेला नाही. समुद्र सपाटीपासून १ हजार ३५० मीटर उंचीवर तो आहे. शत्रूला सहज ताब्यात घेता येत नसल्याने रायगडाची निवड राजधानीसाठी महाराजांनी केली होती. खालून फक्त वारा वर वाहील आणि वरून फक्त पाणीच खाली पडू शकेल, एवढा असा अभेद्य दुर्ग असल्याचे वर्णन महाराजांनी केले आहे. ते यथार्थ असल्याचे ते पाहिल्यानंतर अनुभवता येईल. 

इतिहास

रायगड इ.स. १२ व्या शतकात विजयनगर साम्राज्यात होता व त्यानंतर तो बहामनी व इ.स. १४७९ मध्ये निजामशाही राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. निजामशाहीच्या अखेरपर्यंत (इ.स. १६३६) रायगड त्यांच्याकडेच राहिला व पुढे १६४८ मध्ये तो चंद्रराव मोरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. १६६२ मध्ये महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली. १६७० मध्ये राजगडावरुन राजधानी रायगडावर हलविण्यात आली. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे वैभव लोपले व अखेरीस १० मे १८१८ रोजी कर्नल प्रॉथरने गडावर ताबा मिळवून तो उद्ध्वस्त केला.

रायगडावर काय पाहाल?

रायगडावरील मुख्य वास्तूंमध्ये राजदरबार, शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, बाजारपेठ (नगरपेठ), जगदिश्वर मंदिर, धान्य कोठारे, अष्टप्रधानांचे वाडे, गंगासागर व हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, राणीवसा, महादरवाजा, चित्तदरवाजा, पालखी दरवाजा, अष्टकोनी स्तंभ, हिरकणी बुरुज, टकमक टोक इत्यादींचा समावेश होतो. राजदरबार व नगारखान्यामधील जागेत आपल्याला ध्वनि चमत्कार अनुभवयास मिळतो. अनेक वास्तू भग्न अवस्थेत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी या भग्न वास्तूंचे फेर निर्माण झालेले नाही. पर्यटकांनी या भव्य किल्ल्यावरील भग्न अवशेष पाहून समाधान मानायचे का? ज्यांचा पराक्रम आणि राज्य व्यवस्था पाहण्यासाठी आतुरतेने जाणार्‍या मंडळीच्या पदरी एक प्रकारची निराशा येते. भग्न वाडे आणि अवशेष पाहिल्यानंतर तर असा होता रायगड... म्हणून शिवभक्त माघारी जात आहेत. हे काही महाराष्ट्राला शोभत नाही. 

पुण्यातून रायगडला जायचे कसे?

पुण्यातून रायगडला जाण्यासाठी सुमारे साडेचार ते पाच तास लागतात. स्वारगेट स्थानकावरून महाडपर्यंत बससेवा आहे. तसेच खासगी वाहनाने प्रवास करता येतो. पुणे ते महाड बसचा प्रवास ताम्हिणी घाटमार्गे सुमारे चार तासांचा आहे. महाडवरून रायगड पायथा एस.टी बस किंवा खासगी वाहनाने जाता येते. तेथे पोचण्यास सुमारे एक तास लागतो.

पुणे-रायगड दर्शन बससेवा बंद का केली?

पुणे ते रायगड दर्शन ही थेट एस.टी बससेवा सुरू होती. ती काही महिन्यांपूर्वी बंद केली आहे. त्यामुळे पर्यटकांची कुचंबणा होत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी बससेवा सुरू करण्याची गरज आहे. पुणे-रायगड दर्शन बससेवेबाबत स्वारगेट स्थानकात विचारले तेव्हा ती बंद असल्याचे सांगण्यात आले.

रायगड सर कसा करायचा?

१ हजार ४०० पायर्‍या चढून आल्यावर गडामधील प्रवेश भव्य व दणकट अशा महादरवाजातून होतो. शत्रूपासून भक्कम संरक्षण देणारा हा दरवाजा दुर्गस्थापत्याचा अप्रतिम नमुना आहे. रायगडाच्या बांधणीविषयाचे दोन महत्वपूर्ण शिलालेख जगदिश्वर वाडेश्वर मंदिराच्या आवारात आहेत. त्यात गडाचे बांधकाम केलेले हिरोजी यांचा शिलालेख आहे. त्यावर ‘सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदलकर, असे कोरले आहे. 

रोप वे सुविधा

गडावर जाण्यासाठी रोप वे सुविधेचा वापर करता येईल. रायगड पायथ्यापासून सेवेचा लाभ घेता येतो. अवघ्या ४ ते ५ मिनिटांत रायगडावर जाता येते. 
तिकीट (रुपयांत)
 
जाणे -येणे : ३१५, ज्येष्ठ नागरिक जाणे-येणे : २१९
तीन वर्षांपर्यंत मुलांना : निःशुल्क, दिव्यांग : निःशुल्क
तीन वर्षांपेक्षा जास्त ९ वर्षांपेक्षा कमी : २१०, जाणे येणे : २१५
२५ वर्षांपेक्षा व्यक्तींचा प्रौढ गट (सवलत दर) : २९०
 

Related Articles