चाकणला कचरा कोंडी; नगरपरिषद हतबल   

चाकण, (वार्ताहर) : नगरपरिषद हद्दीत जमा होणारा कचरा खराबवाडी हद्दीतील खासगी जागेतील दगड खाणीजवळ टाकला जात होता. परंतु जागा मालकाने आपल्या हद्दीत कचरा टाकण्यास चाकण नगरपरिषदेला मज्जाव केला असल्याने चाकण नगरपरिषदेची कचरा कोंडी झाली आहे. त्यामुळे चाकणमधील कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. 
 
चाकण शहरातील रोज जमा होणारा कचरा टाकण्यास चाकण नगरपरिषदेकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही. तसेच अन्य पर्याय देखील उपलब्ध नसल्याने हा कचरा खराबवाडी गावच्या हद्दीतील खासगी मालकीच्या मोकळ्या जमिनीवर आणि जवळील दगडाच्या खाणीत टाकला जातो. पूर्वी चाकण ग्रामपंचायत अस्तित्वात असताना देखील याच खाणीत कचरा टाकला जात होता. प्लॅस्टिक कचरा नष्ट होत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कचरा टाकण्यास विरोध करण्यात आला आहे.
 
चाकण शहरातील कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेकडे जागा उपलब्ध नसल्याने गेल्या दोन तीन दिवसांपासून चाकणमधील कचरा उचलला जात गेला नाही. यामुळे घरात, दारात आणि शहरात शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहरातील अनेक भागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. त्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने कचरा जागेवर कुजू लागला आहे. त्यातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
खराबवाडी येथे कचरा टाकण्यासाठी मनाई केल्याने शहरातील रहिवासी भागासह रस्त्यावर आणि बाजारपेठेत कचर्‍याचे ढीग लागले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यामुळे कचरा नेवून टाकावा तरी कुठे ? असा प्रश्न निर्माण झाल्याने नगरपरिषदेची कोंडी झाली आहे. संबंधिताकडून कचरा समस्येवर पर्याय निघत नसल्याने हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरायचे ढीग साचले आहेत. शहरात रोज सुमारे आठ ते दहा टन कचरा गोळा करण्यात येतो. काहींवर्षांपूर्वी कचराप्रक्रिया योजना सुरु करण्यात येणार असल्याची चर्चा होती. तांत्रिक अडचणीमुळे योजना लांबणीवर पडली असे समजते. मात्र, त्या संदर्भात समाधाकारक माहिती मिळू शकली नाही.

बिरदवडीकरांची होईल कचर्‍यातून सुटका 

मागील अनेक वर्षांपासून चाकण शहराचा घनकचरा चाकण आंबेठाण रस्ता लगतच्या वाघजाईनगर येथील दगड खाणीसह मोकळ्या जागेत टाकला जातो आहे. प्लॅस्टिकयुक्त कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने तो नष्ट होत नाही. तो नष्ट करण्यासाठी जाळण्यात येतो आहे. यातील काही कचरा जागेवर कुजत असल्याने बिरदवडी येथील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे शेती पिके धोक्यात आली आहे. कचरा टाकण्यास मनाई केल्याने आमची यातून सुटका होईल असे वाटते. 

- शैलेश फडके, सामाजिक कार्यकर्ते, बिरडवडी.

चाकणचा कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करुन घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. सध्या शहरात कचरा साचल्याने अडचण आली आहे. यावर लवकर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे. 

- डॉ.अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.

 

Related Articles