इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो   

प्राचार्य प्रदीप कदम यांचे प्रतिपादन 

पिंपरी : ’केवळ घटनांची यादी म्हणजे इतिहास नव्हे; तर इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो!’ असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले.श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ’इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर प्राचार्य कदम बोलत होते. भास्कर रिकामे अध्यक्षस्थानी होते. व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव, गोरख पाटील, बापू शिंदे, गोपीचंद जगताप, अनिल मुळे, राजाराम वंजारी, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविक केले.
 
प्राचार्य कदम पुढे म्हणाले, आकाशापेक्षाही विशाल आणि मंदिराइतकाच पवित्र असा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास आहे. आजकाल आपल्या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. भावी पिढीसमोर आपण आपला जाज्वल्य इतिहास ठेवला पाहिजे. महापुरुषांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यावर प्रत्येक महापुरुषाने आपल्या जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे, हे लक्षात येते. शंभुराजे लहान असताना त्यांच्या कानात अन् मनात शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास रुजत गेला; त्यामुळेच स्वराज्यात दुसरा छत्रपती निर्माण झाला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासापासून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शरीराने सुदृढ असलेले मावळे इतिहास घडवू शकले म्हणून ज्याचा पराक्रम कधीच मावळत नाही तोच मावळा! असे म्हटले जाते. कल्याण वाणी, किशोर थोरात, नंदकुमार शिरसाठ, प्रशांत पाटील यांनी संयोजन, तेजस्विनी बडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक पाटील याने आभार मानले.

Related Articles