कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती   

मान्सून स्थिरावला; आठवडाभर मोठ्या पावसाची शक्यता नाही

पुणे : कोकण, विदर्भातील काही भागात पावसाची हजेरी पुढील दोन दिवस कायम असणार आहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनची विश्रांती कायम आहे. पुढील आठवडाभर या भागात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. चार दिवसांपूर्वी वेगाने वाटचाल करणारा मान्सूनही स्थिरावला आहे. 
 
सद्य:स्थितीत मान्सूनची रेषा मुंबई, नगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशी आहे. मागील चार दिवसांपासून मान्सूनने प्रगती केली नाही. त्यामुळे काही भागात ऊन पडले आहे. काही भागात ढगाळ वातावरण कायम आहे, तर काही भागात पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. घाट विभागात मात्र पावसासह वादळी वारे वाहत असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 
 
मान्सूनची उत्तरी सीमा कायम आहे. आज (रविवारी) कोकण, गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथे मेघगर्जना वीजांचा कडकडाटात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील २४ तासात कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोव्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. 
 
पुण्यात पावसाच्या हलक्या सरी 
 
मागील तीन दिवसांपासून पुणे आणि परिसरातील पाऊस  थांबला आहे. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. तर काही वेळा हलका ते अतिहलका पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. शहरातील ढगाळ वातावरण निवळले असल्याने सकाळपासून ऊन पडत आहे. शहरात शनिवारी ३३ अंश कमाल, तर २४.४ अंश किमान तपमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान तपमानात वाढ झाल्याने उकाड्यातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
 
शेती मशागतीच्या कामाला वेग
 
यंदा अनपेक्षितपणे मान्सूनचे राज्यात आगमन झाले. विशेष म्हणजे सुमारे १० ते १५ दिवस सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीसाठी शेतीची मशागत करता आली नव्हती. अनेकांची कामे शिल्लक होती. त्यामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण होते. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी शेती मशागतीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात शेती कामाला वेग आला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.  

Related Articles