जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी   

१३८ ठिकाणचे नमुने दुषित

पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाागाच्या वतीने सातत्याने गाव-गावातील जलस्रोतांची तपासणी करण्यात येत असते. यामध्ये किती स्रोत तीव्र जोखमीचे, मध्यम जोखमीचे आणि सौम्य जोखमीचे आहेत. त्यावर त्यांना कार्ड दिले जाते. या कार्डनुसार उपयायोजना करणे बंधनकारक असते. पावसाळ्याच्या आधी तर प्राधान्याने ही तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३८ ठिकाणचे नुमने दुषित आले आहे.
 
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात वाहून आलेले पाणी, सांडपाणी मिसळण्याची शक्यता असल्याने अतिसार, हगवण, कॉलरा, विषमज्वर म्हणजेच टायफॉइड, कावीळ यासारखे जलजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तसेच तीन महिन्यानंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येते. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १ हजार ३८५ महसूली गावांतील ३ हजार ४०५ जल स्रोतांच्या तपासणीनंतर १३८ ठिकाणचे नमुने दुषित आढळले. यामध्ये जुन्नर तालुक्यात सर्वाधिक दूषित जलस्रोत आढळले. या पाठोपाठ शिरूर, आंबेगाव आणि बारामती तालुक्याचा नंबर लागतो.
 
तर मिळते रेड कार्ड
 
ज्या गावातील पिण्याचे पाणी ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिण्याला योग्य नसते, म्हणजेच ते तीव्र जोखमीचे असते अशा गावांना रेड कार्ड दिले जाते. ३ वर्षांत ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेमुळे मृत्यू झाला असल्यास अशा गावांचा यामध्ये समावेश असतो. ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ हे कार्ड देतात जेणेकरून याठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने करता येतील. पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता देतात. हिरवे कार्ड त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी देतात.
 
कोणत्या कार्डचा काय अर्थ
 
रेड कार्ड : तीव्र जोखीम, पिण्याचे पाणी ७० टक्क्यांपेक्षा अधिक अशुद्ध असणे.
पिवळे कार्ड : मध्यम जोखीम, पिण्याचे पाणी ३० ते ७० टक्के अशुद्ध असणे.
हिरवे कार्ड : सौम्य जोखमी, पिण्याचे पाणी १ ते ३० टक्के अशुद्ध असणे.
 
तीन गावांमध्ये सर्वाधिक जलस्रोत दूषित
 
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावांमध्ये जलस्रोत दूषित आढळले आहे. त्यामध्ये जुन्नरमधील गोद्रे येथे ५, आंबेगावमधील घोडेगाव येथे ४ तर पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथे ४ जलस्रोत आढळले आहेत.
 
राजगडकरांना शुद्ध पाणी
 
वेल्हे (राजगड) ९२ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये एकही जलस्रोत दूषित निघाला नाही. त्यामुळे राजगडकरांना शुद्ध पाणी मिळत आहे. या खालोखाल मुळशी तालुक्यात केवळ २ ठिकाणी दूषित पाणी आढळले. या तालुक्यातून ११२ नमुने घेण्यात आले होते.

Related Articles