दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ   

विक्रांत युद्धनौकेवर पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादाचा घातक खेळ खेळला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचा दहशतवाद विविध पद्धतींचा वापर करुन नष्ट केला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दिला. 
 
राजनाथ सिंह यांनी गोवा येथे विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांशी काल संवाद साधला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही केवळ सैन्य कारवाई नव्हती तर दहशताद्यांवरील हल्ला होता. दहशतवाद नष्ट करण्यासाठी ज्या पद्धती भारत वापरेल त्याची कल्पनाही पाकिस्तान करु शकणार नाही. पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवाद पसरविला जात आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटण केले जाईल.  सीमावर्ती भागांतून अथवा समुद्रातूनही कारवाई केली जाईल. नागरिकांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करणे हा भारताचा हक्क असल्याचे आता जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे भारताला कोणतीही शक्ती कारवाईपासून आता रोखू शकणार नाही. 
 
ऑपरेशन सिंदूरमधील नौदलाच्या सहभागाचे कौतुकही सिंह यांनी या वेळी केले. पाकिस्तानी दहशतवादी तळ आणि हवाई तळावर हल्ला केला तेव्हा भारतीय नौदल अरबी समुद्रात होते. नौदलाने शांतपणे आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे पाकिस्तान नौदलला हालचाल करता आली नाही. भारताच्या आक्रमक कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने जगासमोर मदतीचा पदर पसरला होता. भारताला आवरा आणि पाकिस्तानला वाचवा अशी याचना त्याने केली होती. अखेर पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकणे भाग पडले. ऑपरेशन सिंदूर कारवाई अतिशय आक्रमक आणि नेटकी होती. अल्पकाळात दहशतवादी तळ आणि हवाई तळ भारतीय सैन्याने नष्ट करुन पाकिस्तानला दणका दिल्याचे ते म्हणाले. दहशतवादी आणि त्यांना पोसरणार्‍या पाकिस्तानला कारवाईमुळे योग्य तो शिकविला आहे. आम्ही आमच्या अटीवर कारवाई स्थगित केली आहे, असेही सिंह यांनी सांगितले. 
 

Related Articles