E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
चेकाळलेल्या वृत्तवाहिन्या आणि वावदूक समाजमाध्यमवीर!
Samruddhi Dhayagude
14 May 2025
राहूल गोखले
युद्धाचे वार्तांकन ही अतिशय धोकादायक बाब आहे. लेखकद्वय जेनेट हॅरिस आणि आणि केविन विलियम्स यांनी ‘रिपोर्टींग वॉर अँड कॉन्फ्लिक्ट’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत युद्धमीमांसा करणार्या कार्ल फोन क्लॉसविट्झचे ’युद्ध हे अनिश्चिततेचे क्षेत्र आहे’ हे वचन उद्धृत करून युद्धभूमीत जाऊन वार्तांकन करणार्या पत्रकारांना देखील ते तंतोतंत लागू पडते असे म्हटले आहे. त्याच प्रस्तावनेत ते बीबीसीचे वरिष्ठ प्रतिनिधी जॉन सिम्प्सन यांचे एक विधान उद्धृत करतात. सिम्प्सन लिहितात: ‘पत्रकार मारले जावेत याचा मी समर्थक नाही. पण वार्तांकन करणे हा सुरक्षित व्यवसाय आहे असे कोण म्हणेल? या दोन विधानांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर भारतातील वृत्तवाहिन्यांनी आणि स्वयंघोषित समाजमध्यम प्रभावकांनी (इन्फ्लुएन्सर्स) मांडलेला उच्छाद पाहिला की विरोधाभास प्रकर्षाने जाणवेल. याचे कारण त्यात ना वस्तुनिष्ठ वार्तांकन होते; ना स्वतः स्वीकरलेली जोखीम होती. होता तो केवळ सनसनाटीपणा आणि धुरळा!
युद्धात पहिला बळी जातो तो सत्याचा असे कॅलिफोर्नियाचा सिनेटर हिरम जॉन्सनने पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हटले होते. ते खरेच. याचे कारण अनेकदा शत्रूराष्ट्रावर दबाव टाकण्यासाठी आणि स्वकीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी अशा बातम्या हेतुपुरस्सर पेरल्या जातात. दुसर्या महायुद्धाच्या काळात मित्रराष्ट्र आणि अक्ष राष्ट्रांनी म्हणजे दोन्ही बाजूंनी प्रचारतंत्र म्हणून याचा वापर सढळपणे केला होता. तथापि तो संदर्भ वेगळा; त्यावेळची परिस्थिती निराळी आणि मुख्य म्हणजे युद्धाची व्याप्तीच वेगळी. तोच मापदंड ऑपरेशन सिंदुरच्या वार्तांकनाला लावणे हा निव्वळ बाष्कळपणा. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. त्याने देशभर संतापाची लाट निर्माण झाली. पाकिस्तानच अशा दहशतवाद्यांना पोसतो याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. एरव्ही परस्परांवर यथेच्छ तोंडसुख घेणारे राजकीय पक्ष या मुद्द्यावर मात्र एकजूट होते. विरोधकांनी सरकारशी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. अर्थात त्यातही अचंबित व्हावे असे काही नाही. संकटकाळात पूर्वी देखील सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखविल्याचे प्रसंग आहेतच.
सरकारने पाकिस्तानच्या भोवतीचा फास हळूहळू आवळायला सुरुवात केली. प्रथम सिंधू नदी करार स्थगित केला; मग भारतात व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मुदत दिलेल्या अवधीत देश सोडून जाण्याचे आदेश दिले. पाकिस्तानमधील काही युट्युब वाहिन्यांच्या भारतात प्रसारणावर बंदी घातली. सरकार निर्धाराने पण संयमाने एकेक पाऊल टाकत असताना वृत्तवाहिन्या मात्र युद्धज्वर निर्माण करीत होत्या. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्या दिवसापासून वृत्तवाहिन्यांनी वातावरण पेटवायला सुरुवात केली. आपल्याला प्रेक्षकसंख्या इतरांपेक्षा जास्त मिळावी या सवंग स्पर्धेमुळे बातम्या अधिकाधिक विखारी व भडक होऊ लागल्या. ७ मे रोजी भारताने व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर नेमका प्रतिहल्ला केला आणि ती उद्ध्वस्त करून टाकली. त्यानंतर देशभर हर्षोल्लास होणे स्वाभाविक होते. पत्रकार परिषदेत सरकार आणि लष्कराने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची योजना केली होती. भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर किंवा नागरी वसाहतींवर हल्ला चढविलेला नाही असे सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात येत होते. पण बहुधा त्यात वाहिन्यांना ’सनसनाटी’ काही वाटले नाही. ज्या दिवशी भारताने प्रतिहल्ला चढविला त्या आणि त्यानंतरच्या रात्रीत पाकिस्तानने आगळीक केली. उत्तर भारतातील अनेक शह्ररांवर ड्रोन हल्ले केले; भारतात अनेक शहरात ब्लॅकआऊट करावे लागले. काही ठिकाणी निष्पाप नागरिक ठार झाले. त्यानंतर भारताने साहजिकच प्रत्युत्तर दिले. पण रणभूमीत जो संघर्ष सुरु होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी ’युद्ध’ वृत्तवाहिन्यांच्या स्टुडियोत सुरु झाले होते. झब्बू नावाच्या पत्त्यांचा खेळात जसे खेळणारे एकमेकांवर कुररघोडी करतात त्याच ईर्ष्येने वृत्तवाहिन्या बातम्यांचा प्रपात प्रेक्षकांवर पाडत होते.
अभ्यासूपणाचा अभाव
पाकिस्तानमधील अनेक शहरे या पत्रकारांनी स्टुडिओत बसल्या बसल्या बेचिराख करून टाकली. काहींनी काराचीवर हल्ला करण्यासाठी स्टुडियोतूनच आयएनएस विक्रांतला कामाला लावले. काहींनी पाकिस्तानात देशभर लॉकडाऊन लावून दिला. अनके वाहिन्या संकटकाळात वाजविण्यात येणार्या भोंग्यांचा आवाज पार्श्वसंगीत म्हणून वापरत होत्या. ब्लॅकआऊट देखील ’एक्स्ल्युझिव्ह’ म्हणून दाखविण्यात येत होते. काहींनी पाकिस्तानची तीन-चार लढाऊ विमाने पाडून टाकली. काहींनी शत्रूराष्ट्राच्या वैमानिकांना ’ताब्यात’ घेण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यात ना प्रेक्षकांची संरक्षणसाक्षरता वाढविण्याचा प्रयत्न होता ना युद्धाच्या डावपेचांचे वर्णन करण्याचा अभ्यासूपणा होता. दुसर्या दिवशी सरकार व संरक्षण दलांकडून अधिकृत माहिती देण्यात आली तेंव्हा स्टुडियोमधून ’लादलेल्या’ युद्धातील खोटेपणा चव्हाट्यावर आला. वाहिन्यांनी लष्करी कारवाईचे थेट प्रक्षेपण दाखवू नये, अशी ताकीद अगोदरच सरकारने दिली होती; आता सायरनच्या आवाजाचा वापर बातम्या देताना करू नये, असेही निर्देश सरकारने दिले. जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते यातच किती र्हास झाला आहे या वास्तवाची कल्पना येऊ शकेल. वाहिन्यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न यातून निर्माण होत नाही का?
माध्यमांचा बेजबाबदारपणा
मिळमिळीत अवघे टाकावे हे खरे; पण म्हणून अगा जे घडलेचि नाही ते दाखवावे हा बेजबाबदारपणा झाला. यात केवळ सत्याचा आणि तथ्यांचा बळी जात नाही तर पत्रकारितेच्या मूल्यांनाच नख लागले. प्रत्यक्ष युद्धभूमीत जाऊन वार्तांकन करणे जोखमीचे असते; पण स्टुडियोत बसून आरडाओरड करून बातम्या देण्यात ना शौर्य ना तारतम्य; मात्र तो दोष त्या वाहिन्यांनाच द्यावा का? याच वाहिन्या सत्ताधार्यांची तळी सतत उचलत असताना त्याच वाहिन्या अगणितांना ’गोड’ वाटत होत्या. देशभक्ती काय ती आपल्यापाशीच आहे असा गर्व झालेल्या वाहिन्यांना वेळीच वेसण घातले गेले नाही त्याचा तर हा परिपाक नव्हे ना? यापुढे युद्धजन्य प्रसंग येऊ नयेत ही अपेक्षा ठीक; पण तशी ती येणारच नाही असे मानणे बाळबोधपणाचे. तसे ते येतील तेंव्हा याच वाहिन्यांनी असेच चेकाळता कामा नये म्हणून सरकार काय करणार? मुळात अशा बेजाजाबदारपणामुळे सरकारला माध्यमांवर नियंत्रण आणण्यासाठी आयतेच कोलीत मिळत नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरे मिळणार का हा मुख्य प्रश्न आहे.
याचं पंक्तीतील एक घटक म्हणजे स्वयंघोषित समाजमाध्यम प्रभावक (इन्फ्लुएन्सर्स). भडक विधाने करायची; देशभक्तीच्या आपल्याच फूटपट्ट्या तयार करायच्या; सोयीस्करपणे ’स्क्रिनशॉट’ टाकून दुभंग तयार करायचा; सर्व विषयांत आपल्यालाच काय ते कळते या अविर्भावात विरोधी विचारधारेच्याच नव्हे तर किरकोळही विरोधी मत प्रदर्शन करणार्याला देखील लक्ष्य करायचे; समाजमाध्यमवीरांच्या झुंडींनी कोणाच्याही देशभक्तीची चाचणीचे निकष ठरवायचे हा सगळा प्रकार नवीन नसला तरी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हा वावदूकपणा पुन्हा अधोरेखित झाला. अर्थात हे करण्यामागे समाजावर प्रभाव टाकण्यापेक्षा आपल्या ’लाईक्स’ वाढविण्याचा; आपापल्या राजकीय नेतृत्वाच्या नजरेत स्वतःस सिद्ध करण्याचा हेतू वरचढ असतो. अतिरंजितच नव्हे तर असभ्य, असंस्कृत पोस्टना त्यातून पेव फुटते. दुसर्या विचारसरणीच्या मंडळींविषयी शेलकी विधाने करण्याची चढाओढ लागते. एका कोणा समाज मध्यमवीराचा प्रभाव समाजावर पडतो असे मानणे भाबडेपणाचे; तरी त्या पोस्टवर पडणार्या प्रतिक्रियांच्या पावसातून समाज मात्र दुभंगतो. ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक स्वयंघोषित समाजमाध्यमवीरांनी वाहिन्यांना देखील लाजवेल इतक्या मर्कटलीला केल्या.
आत्मपरीक्षणाची गरज
या दोन प्रवाहांनी समाजालाच अंतर्मुख केले आहे यात शंका नाही. युद्धभूमीवर जाऊन, जीवावर उदार होऊन वार्तांकन करणार्यांचे किंवा वस्तुनिष्ठ वार्तांकन व विश्लेषण करणार्यांचे महत्व अशाने झाकोळले जाते; टीआरपी साठी माध्यमे आणि लाइक्ससाठी समाजमध्यमवीर युद्धजन्य परिस्थिती किंवा लष्करी कारवाईसारख्या गंभीर घटनेला देखील थिल्लरपणाच्या पातळीवर नेणार असतील तर त्यातून एक सामूहिक उन्माद निर्माण होईलच; पण तथ्य, सत्य आणि समाजस्वास्थ्य यांचा मात्र बळी जाण्याचा धोका उद्भवेल. येथे लिविंग मार्क्सिझम या मासिकाचा संपादक माईक ह्यूमचे मत अवश्य नोंदविले पाहिजे: ‘अभिप्राय व्यक्त करणे आणि आपले पूर्वग्रह वस्तुनिष्ठ वार्तांकनाच्या नावाखाली व्यक्त करणे यात फरक आहे. तसाच फरक युद्धातील बातम्या देण्यात आणि जणू काही आपणच युद्ध करीत असल्याच्या अविर्भावात बातम्या देणे यातही आहे..’ हे आत्मपरीक्षण किती निकडीचे आहे याची जाणीव ऑपरेशन सिंदूर नंतर वृत्तवाहिन्यांनी आणि समाजमाध्यमवीरांनी घातलेल्या हैदोसाने करून दिली आहे.
Related
Articles
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात
05 Jun 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
30 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
31 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी