मुंबईतील अब्जावधीच्या जमिनी अदानींच्या घशात   

त्यांना मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार?

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला
 
मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन दिली आहे. वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
 
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजप-युती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु, अदानीला देण्यासाठी मात्र भाजप-युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? असा सवाल करताना सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली.
 
प्रार्थना स्थळांवरील भोंग्याबाबतचा आदेश मागे घ्या 
 
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजप-युती सरकार राज्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत असते. आता या सरकारच्या गृहविभागाने राज्यातील मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा सर्व प्रार्थनास्थळांवरील ध्वनिवर्धका-साठी एक फतवा जारी केला आहे. प्रार्थनास्थळांवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले असताना राज्य सरकारने वेगळा फतवा काढून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, हा फतवा मागे घ्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
 
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच, पाहणीनंतर राज्यपालांना भेटून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.  

Related Articles