अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू   

६ जणांची प्रकृती चिंताजनक

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा भागात विषारी मद्य प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला.  इतर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या लोकांना अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मजिठातील भुल्लर, टांगरा, आणि सांधा या गावांमध्येही विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. मृतांपैकी बरेच जण गावातील विटभट्टीवर काम करणारे कामगार आहेत. या घटनेनंतर कारवाई करत पंजाब पोलिसांनी बनावट दारू पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसह पांच जणांना अटक केली. 
 
विषारी मद्य प्यायल्याने या लोकांचे आरोग्य बिघडले आहे. सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मरारी कलान गावातील ४ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रभजीत सिंह हा बनावट दारू पुरवण्यामागील सूत्रधार आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. या शिवाय मुख्य आरोपीचा भाऊ कुलबीर सिंह उर्फ ​​जग्गू, साहिब सिंह उर्फ ​​सराई, गुरजंत सिंह आणि जीताची पत्नी निंदर कौर यांनाही अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केली कारवाई 

विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमधील बरेच जण हे मरारी कलान गावचे रहिवाशी होते. यांपैकी बरेच जण अजूनही मृत्यूशी झुंजत आहेत. या घटनेनंतर पंजाब सरकारने कारवाई केली आहे. राज्य सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या बनावट मद्य व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर मजिठा प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली. पंजाबमध्ये मद्य पिण्यामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही विषारी मद्य प्यायल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Articles