गोदामांची साठवणूक क्षमता वाढवावी : रावल   

पुणे :आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्या माध्यमातून अद्ययावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळाच्या पुण्यातील आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
 
रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३ लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे. येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामांचे रेटिंग करून घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.राज्यातील गोदामांमध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.
 
शेतकर्‍यांना साठवणूक भाड्यांमध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण, तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते, असे सांगून पणनमंत्री रावल म्हणाले, धान्य साठवणुकीमुळे बाजारभाव उच्च असताना शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकर्‍यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकर्‍यांचे अन्न धान्य कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन शेतमालास चांगला बाजार मिळेल.दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील ३ वर्षाची तुलनात्मक आर्थिक स्थिती साठवणूक क्षमता व साठवून क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक यांसह अन्य प्रकल्पांबाबत माहिती दिली.

Related Articles