चारधाम मार्ग आणि सीमाभाग ‘हाय अलर्ट’वर   

उत्तराखंड सरकारने उचलली महत्त्वाची पावले

उत्तरकाशी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीनंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि राज्याच्या सर्व सीमावर्ती भागात भक्कम सुरक्षा ठेवण्याचे आणि सीमावर्ती भागात संशयास्पद हालचालींवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
 
उत्तराखंडच्या उत्तरकाशी आणि चमोलीच्या चीनशी तर चंपावत आणि उधम सिंहच्या सीमा नेपाळशी सीमा लागून आहे, तर पिथोरागडची सीमा दोन्ही देशांशी आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या चार धाम यात्रेदरम्यान चारही तीर्थस्थळांच्या यात्रा मार्गावरील सुरक्षा उपाययोजना सक्रिय कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती सरकारी निवेदनाद्वारे दिली आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, उत्तराखंडमधील प्रमुख आस्थापने, धरणे आणि वीज प्रकल्पांवरही चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासन, सरकारी विभाग आणि पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले.
 
“उत्तराखंडमध्ये असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तयार असायला हवे यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर अन्नधान्यांसह आवश्यक वस्तूंचा पुरवठा राखला पाहिजे. रुग्णालये आणि सर्व आवश्यक औषधांची व्यवस्था निश्चित केली पाहिजे,” असे निवेदनात म्हटले आहे.
 
निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, नागरी सुरक्षा संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना मदत आणि बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दहशत आणि खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जनतेपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि असे प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, धामी यांनी असेही आदेश दिले की, अपरिहार्य परिस्थिती वगळता, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करू नयेत. यासह त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगितले.

Related Articles