जरंडेश्वर मळीप्रश्नी कुमठेकर ग्रामस्थ आक्रमक   

ग्रामसभेत साखर कारखान्यावर कारवाईची मागणी

सातारा, (प्रतिनिधी) : जरंडेश्वर शुगर मिलची मळी व डिस्टिलरीच्या टाकाऊ रासायनिक पाण्यामुळे कुमठ्याच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असून, याप्रश्नी पुढील आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार कुमठे गावच्या ग्रामसभेने सरपंच संतोष चव्हाण यांना  बहाल केले.
 
कुमठे गावची ग्रामसभा २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गावातील श्री ज्योतिर्लिंग मंदिराच्या पारावर बोलविण्यात आलेली होती. मात्र, ही सभा कोरमअभावी तहकूब झाली होती. ही तहकूब ग्रामसभा शुक्रवारी ज्योतिर्लिंग मंदिराच्या पारावर सरपंच संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन ग्रामसेवक भरत जाधव हे करत असताना त्यातील जरंडेश्वर शुगर मिलचे मळीमिश्रित पाणी व डिस्टिलिरीचे रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडण्यात येतअसून, त्यामुळे गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या दोन विहिरींचे पाणी दूषित होत आहे. 
 
हेच पाणी पुढे गावाला नळाद्वारे पुरवण्यात येत आहे. त्यामुळे गावात गॅस्ट्रोसदृश आजारांचे प्रमाण वाढत असून, यावर उपाययोजनाकरण्याबाबत विषय वाचण्यात आला. त्यावर ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करत हे पाणी ताबडतोब थांबविण्याच्या सूचना मिलच्या व्यवस्थापनाला कराव्यात. सूचना करूनही व्यवस्थापनाकडून पुन्हा पुन्हा पाणी सोडले जात असेल, तर प्रसंगी संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसावे आदी सूचना करण्यात आल्या. 
 
मात्र, काहीही करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. शेवटी याप्रश्नी पुढील आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्वाधिकार ग्रामसभेने सरपंच संतोष चव्हाण यांना बहाल केले. या ग्रामसभेत इतरही विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. कोरेगाव तालुक्यात १५ दिवसांत प्रचंड पाऊस झाल्याने ओढे-नाले भरून वाहत आहेत. तिळगंगा नदीलाही पूर येऊन गेले आहेत. सध्या नदीला चांगले, पिण्यायोग्य पाणी आहे. 
 
आम्ही दररोज तिळगंगा नदीकाठी आपापल्या शेतात शेतीकामासाठी जात असतो. मात्र, आम्हाला कधीही मळीयुक्त, रासायनिक पाणी दिसले नाही. सरपंच संतोष चव्हाण यांनी काढलेले निवेदन चुकीच्या माहितीच्या आधारावर व वस्तुस्थितीला धरून वाटत नाही, असे पत्रक कुमठे ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी रोमन व काही शेतकर्‍यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे.

Related Articles