अनुपम खेर यांचा नकारात्मक बोलणाऱ्यांना थेट इशारा   

नवी दिल्ली : भारताने देशातील सहा हल्ल्यांचा बदला एकाचवेळी ६ मे रोजीच्या रात्री ऑपरेशन 'सिंदूर' राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. ऑपरेशन सिंदूरबाबत अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना नकारात्मक बोलणाऱ्यांना इशारा दिला आहे.

ऑपरेशन सिंदूरमधून एक संदेश 

ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यातून हा संदेश देण्यात आला की, जो कुणी आपल्या देशाच्या विरोधात डोळे वटारुन बघेल, आपल्या देशात दहशतवाद माजवेल, भगिनींचे कुंकू पुसेल त्याला कसा धडा शिकवू शकतो याचे उदाहरण म्हणजे ही मोहीम आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात सुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली आहे. एक जाणीव प्रत्येकाला झाली की, आपल्या देशाचे नेतृत्व, आपली सैन्य दले ही शांत नाहीत असे अनुपम खेर यांनी म्हटले. 

सैनिकांना वंदन करा-अनुपम खेर

पाकिस्तानचे जे दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले ती संपूर्ण मोहीम कशी पार पडली याची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी. त्या दोघींना पाहून माझी छाती अभिमानाने फुलून आली. आपल्या देशाच्या महिलांची शक्ती दिसून आली. आपल्या देशातल्या महिलांचे कुंकू २२ तारखेच्या हल्ल्यात पुसण्यात आले. मात्र शत्रू राष्ट्राला आपल्या महिलांनीच ऑपरेशन सिंदूरद्वारे उत्तर दिले. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की, जिथे आपण असू सेनेच्या जवानाला पाहिले तर त्यांना वंदन करा. त्यांना थँक्यू म्हटले पाहिजे असे अनुपम खेर यांनी म्हटले.

नकारात्मक बोलणाऱ्यांना इशारा

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. मी १९६२,१९६५, १९७१ चे युद्ध पाहिले आहे, सगळी युद्धं पाहिली आहे. मी लष्करातल्या अधिकाऱ्यांना पाहिले. त्यांना पाहून वंदन करावेसे मला कायमच वाटते. जे नकारात्मक बोलतात त्यांचा मी इशारा देऊ इच्छितो की, हे तुम्ही असे केलेत तर तुम्हाला देशाबाहेर हाकलण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल. आपल्या सैन्य दलाच्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले. 
 

Related Articles