२५ मिनिटांत नऊ दहशतवादी तळ उध्वस्त   

पहलगाम सारख्या सहा हल्ल्यांचा बदला ; पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये कारवाई 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त केले. यात मसूद अजहरच्या कुटुंबासह ७० हून अधिक दहशतवादी मारले गेले. हवाई दल, नौदल आणि लष्कराने संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये जैश-ए-महमदचे पाच, लष्कर-ए-तोयबाचे तीन आणि हिजबूल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महमदच्या मुख्यालयांचा यामध्येसमावेश आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून होते. भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठी जगभर मदतीची याचना करत फिरणारा आणि सिंधू नदीतून आता रक्ताचे पाट वाहतील, असे म्हणणारा पाकिस्तान आता बिथरला आहे.
 
भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन ‘आपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांनी ही माहिती दिली. दहशतवाद्यांची प्रशिक्षण आणि भरतीची केंद्रे तसेच जैश-ए-महमद, लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर काल पहाटे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश न करता कारवाई करण्यात आली, असे सांगितले. या नऊ ठिकाणांवर मोठ्या संख्येने दहशतवादी उपस्थित होते, असेही मिस्री म्हणाले. कालच्या कारवाईत जैश-ए-महमदच्या बहावलपूरमधील मुख्यालय आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर समावेश होता, असेही त्यांनी सांगितले.
 
६ आणि ७ मे च्या मध्यरात्री १ ते १.३० दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. हे लक्ष्य विश्वसनीय माहितीच्या आधारे निवडण्यात आले होते. पाकिस्तानातील चार आणि व्याप्त काश्मीरमधील पाच ठिकाणांना काल  लक्ष्य बनविण्यात आले. ते आरोग्य केंद्राच्या नावाखाली चालविले जात होते. निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. पाकिस्ताने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, पाकिस्तानी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतीय हवाई दलाने बहावलपूर आणि मुरीदकेला लक्ष्य केले, असे सांगितले. लाहोरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर भारतीय हवाई दलाने ‘हॅमर’ व ‘स्काल्प’ बॉम्ब टाकले. या ठिकाणी १९९० पासून लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय चालविले जात होते.  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी अजमल कसाब आणि इतर नऊ दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी  डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांनीही याठिकाणी भेट दिली होती.
 
२०११ मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात मारला गेलेला अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याने मुरीदके येथील मुख्यालयासाठी १० लाखांची मदत केली होती. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तोयबाने जम्मू-काश्मीर, बंगळुरू आणि हैदराबादसह देशाच्या इतर अनेक भागात दहशतवादी हल्ले केले आहेत, असेही मिस्री यांनी सांगितले.
 
मुरीदके येथील मरकज तैयबा (ज्याला ’दहशतवादाचा कारखाना’ म्हटले जाते) हे लष्कर-ए-तोयबाचे सर्वात महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र होते. दहशतवादी संघटनेत भरती झालेल्यांचे या ठिकाणी ब्रेनवॉश करतानाच त्यांना प्रशिक्षण दिले जात असे. 

ऑपरेशन सिंदूर यशस्वी

भारतीय सशस्त्र दलाने कारवाई केलेले दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे बहावलपूर. १९९९ मध्ये विमान अपहरणानंतर सुटका झालेला मसूद अजहरचे बहावलपूर हे महत्त्वाचे केंद्र बनले होते. जैश ए महमद २००१ मध्ये संसदेवर हल्ला, २००२ मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे जवानांवर हल्ला केला होता. याशिवाय, अन्य हल्ल्यांमागे त्याचा हात होता.
 
जागतिक दहशतवादी म्हणून अजहरला घोषित करण्यात आले असून, २०१९ नंतर सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. त्याने जानेवारी २००० मध्ये जैश ए महमद दहशतवादी संघटना सुरू केली. त्याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय, अफगाणिस्तानातील तत्कालीन तालिबान नेते, ओसामा बिन लादेन आणि पाकिस्तानमधील सुन्नी पंथीय संघटनांकडून मदत मिळाली, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह येथे जैशकडून दहशतवाद्यांची भरती केली जात असे. तसेच, प्रशिक्षण दिले जात होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात दोन स्थानिकांसह एक परदेशी पर्यटकाचा समावेश होता. तर, २३ अन्य राज्यातून पर्यटनासाठी आले होते. या हल्ल्यानंतर भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, अशी मागणी देशवासीयांकडून सातत्याने केली जात होती. विरोधी पक्षानेदेखील आम्ही सरकारच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होते.
 
पहलगामसह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा भारताने काल बदला घेतला. रात्री दीडच्या सुमारास भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भीमबर, कोटली, सियालकोट, मुझफ्फराबादसह आदी ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणांवरुन पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करत असे. दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण दिले जात असे. या कारवाईसाठी राफेल आणि सुखोईचा वापर करण्यात आला, असे सांगितले जाते.

पंतप्रधानांचा परदेश दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रोएशिया, नेदरलँड आणि नॉर्वे देशांचा दौरा रद्द केला. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा आटोपता घेत पंतप्रधान मायदेशी परतले होते. यासोबतच, रशियाचा आगामी दौरा रद्द केला होता.

ही ठिकाणे झाली उद्ध्वस्त

१. बहावलपूर : जैश-ए-महमदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर
 
२. मुरीदके : लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय
सीमेपासून ३० किमी अंतरावर
 
३. सवाई नाला : लष्कर-ए-तोयबाचे तळ
सीमेपासून ३० कि.मी.दूर
 
४. गुलपूर : दशतवाद्यांचे तळ
 नियंत्रण रेषेपासून ३५ कि.मी. दूर ८० दहशतवादी
 
५. बिलाल : जैश-ए-महमदचे तळ
 सीमेपासून ३५ कि.मी.दूर
 
६. कोटली : नियंत्रण रेषेपासून १५ किमी अंतरावर 
 
७. बरनाला : दहशतवाद्यांचे तळ
 नियंत्रण सीमा रेषेपासून १० कि.मी.दूर
 
८. सरजाल : जैश-ए-महमदचचे तळ
 सीमेपासून ८ कि.मी.दूर
 
९. मेहमूना : हिजबुल्लाचे प्रशिक्षण केंद्र : सीमेपासून १५ कि.मी.दूर.
 

Related Articles