श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी   

अहिल्यानगर : श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्यात तालुक्यात सरासरी २३.७ मिलिमीटर पाऊस असतो. मात्र, यंदा सरासरीपेक्षा २५० मिमिहून अधिक म्हणजे हंगामच्या निम्मा पाऊस मे महिन्यातच पडला. पुढील ८ दिवस दमदार पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस असू असून भीमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे, कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
अवकाळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. गेल्या ८ दिवसांपासून बरसणार्‍या पावसाने जिल्ह्यातील कांदा पिकासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रविवारी झालेल्या तुफान पावसामुळे नगर शहरातील सीना नदीला पहिला पूर आला तर कर्जत-जामखेड, नेवासे, पाथर्डी, राहाता, अकोले या तालुक्यांतही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शेतातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत व बळीराजाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

Related Articles