राज्यात मुसळधार   

वीज कोसळल्याने एक ठार; पुरातून ४८ जणांची सुटका

मुंबई : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस झाला. वीज कोसळल्याने एक़ाचा मृत्यू झाला. तर, पावसाच्या पाण्यात अडकलेल्या ४८ जणांची सुटका झाली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दौंडमध्ये २४ तासांत ११७ मिमी, बारामतीमध्ये १०४.७५ मिमी, तर इंदापूरमध्ये ६३.२५ मिमी पाऊस पडला.
 
बारामतीमध्ये २५ घरांचे नुकसान झाले. तर, पूरग्रस्त भागात अडकलेल्या सात जणांची सुटका करण्यात आली. याशिवाय, ७० ते ८० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यात आला. रविवारच्या पावसाने अनेक ठिकाणी मोबाईल सेवा खंडीत झाली होती. ती काल पूर्ववत झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाण्यात अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये १६३.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. दुधेबावी गावाजवळ तीस नागरिक अडकले होते. त्यांची सुटका करतानाच त्यांच्या भोजनाची आणि तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
 
सोलापूरमध्ये २४ तासांत ६७.७५ मिमी पाऊस पडला. माळशिरस तालुक्यात सात नागरिक पुरात अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे पंढरपुरातील भीमा नदीच्या पात्रात तीन जण अडकले होते, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर महाड-रायगड रस्ता मुसळधार पावसामुळे बंद करावा लागला. मुंबईत गेल्या २४ तासांत २९४ मिमी पाऊस पडला. शहरात शॉर्ट सर्किटच्या १८ आणि भिंत कोसळण्याच्या पाच घटना घडल्या. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई महानगरपालिका अधिकारी, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतर आपत्कालीन सेवा सज्ज आहेत. तसेच, शहरात पाच एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
 

Related Articles