केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान   

आठ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसणार आहे. त्यामुळे, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी राज्यातील आठ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला.यामध्ये पथानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगो जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
केरळमध्ये यंदा १६ वर्षांनंतर प्रथमच लवकर मान्सून दाखल झाला. एरवी, १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो. मात्र, यंदा आठ दिवस आधीच म्हणजे २४ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. 
 
मान्सूनमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यांमुळे राज्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे आणि दूरध्वनीचे खांब कोसळले. सखल भागात पाणी साचले. त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. वीज आणि दूरध्वनी सेवा खंडीत झाली. वायनाड जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
 
रेड अलर्ट म्हणजे २४ तासांत २० सेमी पेक्षा जास्त मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस. ऑरेंज अलर्ट म्हणजे ११ सेमी ते २० सेमी पर्यंत अति मुसळधार पाऊस आणि यलो अलर्ट म्हणजे ६ सेमी ते ११ सेमी पर्यंत मुसळधार पाऊस.
 

Related Articles