मार्केटयार्डातील कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित   

कांदा-बटाटा विभागातील पोत्यात ५० किलोपेक्षा अधिक माल नको 

पुणे : पणन संचालकांनी कांदा-बटाटा बाजारात येणार्‍या पोत्यात ५० किलोच माल असावा, त्यापेक्षा अधिक माल पोत्यात भरता येणार नाही, अशा सूचना राज्यातील सर्व बाजारपेठांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन शनिवारी दिले. त्यामुळे मार्केटयार्डातील कामगार संघटनेतर्फे येत्या २ मे पासून पुकारण्यात आलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली. 
 
कांदा-बटाटा विभागात येणारा माल ५० किलोच्या स्वरूपात यावा, पोत्यात अधिकचा माल भरला जात असल्यामुळे कामगाराच्या मनका आणि गुडघ्याला त्रास होत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून पोत्यात ५० किलो माल भरण्याच्या सूचना करण्याची विनंती कामगार संघटनेकडून पणन संचालकांना करण्यात आली. ही सूचना त्यांनी मान्य केली. पणन संचालक यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांकरीता पुन्हा एकदा परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात येईल, असे सांगितले. तसेच यासंदर्भात राज्यातील वर्तमान पत्रात आवाहन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. सवलतीच्या दरात चांगला बारदान (पिशवी) बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का? याबाबत पणन संचालकानी मत व्यक्त केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे साचिव डॉ. राजारामजी धोंडकर, कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, कामगार यूनियन सचिव विशाल केकाणे, उपाध्यक्ष दीपक जाधव उपस्थित होते.
 
राज्यातील बाजार समित्यांचे बाजार आवारात मुख्यत: कांदा-बटाटा विभागामध्ये बटाटा व इतर शेतीमालाची ६० ते ७० किलोपेक्षाही जास्त वजनाची आवक होत आहे. गाडी खाली करताना पोत्यास हुक लावला की पोती फाटतात तसेच कामगारांना माणक्याचे व गुडघ्याचे आजार होत आहेत. तसेच माल हा नायलॉनच्या पिशविमध्ये येत आहे. सदर पिशवीची वाहतूक व काटा करत असताना कामगारांची बोटे कापली जात आहेत. या सर्व बाबींमुळे कामगारांचे गैरहजरीचे व राजीनामे देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्याची अमलबजावणी होत नसल्याने बाजार पेठ बंद ठेवण्याचे निर्णय कामगार संघटनांकडून घेण्यात आला होता. या बाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार यूनियन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य पणन संचालकांना देण्यात आले होते.

Related Articles