घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट   

अधीक्षकांनी कारवाई करावी, नागरिकांची मागणी

भिमाशंकर, (वार्ताहर) : घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात लग्नसराईत सर्रांस डीजेचा दणदणाट सुरू आहे. वरातीमध्ये दारू आणि डीजेच्या खणखणाटामध्ये तरूणाई बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. डीजेवर निर्बंध असतानाही मोठया प्रमाणात पोलिसांच्या आर्शीर्वादाने डीजेचा दणदणाट सुरू असल्याचे पाहवायास मिळत आहेत. डीजेचालकांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 
घोडेगाव परिसरामध्ये मागील दोन महिन्यांपासून मोठया प्रमाणात विवाहाचा धडाका सुरू आहे. मोठया प्रमाणात पैशांची उधळपट्टी होत आहे.  फटाके, दारूवर मोठया प्रमाणात पैसे खर्च केले जात आहेत. सत्कार समारंभात फेटा बांधण्याची फॅशन सुरू आहे. यावर हजारो रूपये खर्च केले जात आहेत. अनाठायी खर्चाबाबत विवाह मालक कोणताही विचार करीत नाहीत. वरातीसाठी मोटार व मोटार सायकल वाहनांव्दारे अवैध्य दारू वाहतूक मोठया प्रमाणात होत असताना पोलीस यांवर कारवाई करताना दिसून येत नाही. डीजेचा खर्च ५० हजार रूपयांच्या पुढे आरामात केला जात आहे. डीजेच्या आवाजामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. पोलीसांचे नियंत्रण नसल्यामुळे रात्रभर वरातीत डीजेचा आवाज सुरू असतो. तरूणवर्ग दारू पिऊन बेधुंदपणे नाचत आहेत. त्यामुळे भांडणांचे प्रमाण देखील वाढले आहे. 
 
गावांतील बाजारपेठेतून व घोडेगाव पोलीस ठाणे जवळ डीजेंचा दणदणाट मोठया प्रमाणात होत आहे. दुतर्फा राहणार्‍या नागरिकांना आवाजाचा खूप त्रास होतो. आजारी नागरिक किंवा जेष्ठ नागरिक यांनी डीजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना करूनही डीजेवाले किंवा वरातीत नाचणारी तरूण मुले ऐकायला तयार होत नाहीत. पोलिसांकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यास त्या डीजेवाल्यांना तक्रार करणार्‍यांचे नाव सांगितले जाते. त्यामुळे डीजेमालक तक्रार करणार्‍या नागरिकांच्या विरोधात रोष व्यक्त करत असल्याने ग्रामस्थ डिजेवाल्यांच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार देत नाहीत. याबाबत नागरिकांच्या डिजेंच्या होत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रसिध्दी माध्यमांमधून वारंवार बातम्या प्रसिध्द होवून सुध्दा पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात डीजेंचा होत असलेल्या दणदणाटावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
 

Related Articles