अकरावी प्रवेशासाठी नोंदणी बंधनकारक   

नोंदणी न करणार्‍यांना प्रवेश नाही

पुणे : राज्यभरात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने होत आहे. यापूर्वी ही प्रक्रिया ठराविक महानगरपालिका शहरात राबवली जात होती. अकरावी प्रवेशासाठी तब्बल २० लाख ९१ हजार ३९० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करतील असेच विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. जे विद्यार्थी नोंदणी करणार नाहीत, त्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
 
राज्य मंडळाने यंदा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर केला आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अकरावीच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानंतर पहिल्या नियमित फेरीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जूनला जाहीर होणार आहे. पहिली नियमित फेरी २६ मे ३ जून दरम्यान पार पडणार असून, यात विद्यार्थी नोंदणी, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा प्रयत्न आहे.
 
अकरावी प्रवेशासाठी अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम द्यायचा आहे. त्याला मिळालेले गुण आणि पसंतीच्या महाविद्यालयाचे कट-ऑफ यानुसार पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी आणि महाविद्यालय निवड/वाटप प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर १० जूनला प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी, कट-ऑफ जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेश निश्चिती करणे, प्रवेश नाकारणे आणि प्रवेश रद्द करणे ही प्रक्रिया होईल.

Related Articles