पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन   

राज ठाकरे यांचा इशारा

मुंबई, (प्रतिनिधी) : शाळेत पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकविल्या जातील. हिंदीची सक्ती केली जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप त्याबाबतचा लेखी आदेश काढलेला नाही. आता तर हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईलाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील (मराठी आणि इंग्रजी) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. अन्यथा मनसे जे आंदोलन करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही राज यांनी दिला आहे. हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरुवात झाली आहे. सरकार आपल्या निर्णयावरून घूमजाव करणार असे दिसते. असे काही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभे करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या-त्या राज्यांची भाषिक अस्मिता, असेही राज म्हणाले. 

Related Articles