श्रेयस अय्यर, महमद शमी, कसोटी संघातून बाहेर   

मुंबई  : दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि उलथापालथीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने अखेर २० जूनपासून सुरू होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर केली. शुभमन गिलला कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही निवृत्त झाल्यामुळे हे निश्चित होते. त्यामुळे आत कोण आहे आणि बाहेर कोण आहे? हे जाणून घेऊया टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला आगामी मालिकेतून वगळण्यात आले आहे. 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केले आहे. तर स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पण संधी मिळाली नाही. याशिवाय ज्या नावांची घोषणा झालेली नाही त्यांच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली. यापैकी एक नाव म्हणजे सरफराज खान. या दौर्‍यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती आणि त्याची फिटनेसही दाखवली होती.
 
टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रेयस अय्यरला इंग्लंड दौर्‍यातून वगळण्यात आले आहे. अय्यर गेल्या वर्षी कसोटी संघात परतला. २०२४ मध्ये, त्याने ३ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याने ०, ४*, ३५, १३, २७ आणि २९ धावा केल्या. दुसरीकडे अय्यरने पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. पण त्याला इंग्लंड दौर्‍यातून वगळण्यात आले आहे. अय्यरच्या जागी करुण नायरला संधी मिळाली आहे.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनच्या सरासरीला टक्कर देणारा दुहेरी शतकवीर सरफराज खान यालाही संघातून वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात सरफराजने ६२ आणि नाबाद ६८ धावा केल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये, सरफराजने न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची दमदार खेळी करून आपले शतकाचे खाते उघडले. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली, परंतु इंग्लंड दौर्‍यासाठी निवडलेल्या संघात त्याला प्राधान्य देण्यात आले नाही. या संघात तरुण साई सुदर्शनची निवड झाली आहे. 
 
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान, दुखापती देखील एक अडथळा बनल्या आहेत, परंतु यावेळी शमी तंदुरुस्त असताना त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. शमीच्या जागी अर्शदीप सिंगला कसोटीत स्थान देण्यात आले आहे. या तीन स्टार शिवाय हर्षित राणा, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे हे खेळाडू आहेत, ज्यांना भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळालेले नाही. 

Related Articles