कोरोनाच्या वाढीचे गूढ लवकरच उलगडणार   

आठवडाभरात निष्कर्ष हाती येण्याची शक्यता

पुणे : राज्यात मे महिन्यापासून कोरोना संसर्गामध्ये वाढ सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या कोणत्या उपप्रकारामुळे ही वाढ सुरू आहे, याचे गूढ लवकरच उलगडणार आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू झाले आहे. या आठवडाअखेरीस निष्कर्ष हाती येण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात संसर्गातील वाढीस कारणीभूत असलेला कोरोना विषाणूचा उपप्रकार स्पष्ट होणार आहे. 
 
कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सुविधा पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आहे. एनआयव्हीमध्ये देशभरातून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने येतात. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सूचना केली. याबाबत महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख व जनुकीय क्रमनिर्धारण राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत महाविद्यालयाला जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठविण्याची सूचना करण्यात आली.
 
पुण्यासह ठाणे, सोलापूर आणि लातूरमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने महाविद्यालयाला पाठविण्यात आले. आतापर्यंत महाविद्यालयाकडे १०० नमुने आले आहेत. त्यामुळे या नमुन्यांच्या साहाय्याने करोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे. या जनुकीय क्रमनिर्धारणाचे निष्कर्ष या आठवड्याच्या अखेरीस हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोरोना विषाणूच्या कोणत्या उपप्रकारामुळे संसर्गात वाढ सुरू आहे हे निष्पन्न होईल, अशी माहिती डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

२४ तासांत ३० रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८६ रुग्ण आढळले आहेत. त्यात पुण्यात सर्वाधिक ३० रुग्ण असून, त्यामध्ये पुणे महापालिका २४, पिंपरी-चिंचवड महापालिका ३ व ग्रामीण ३ अशी रुग्णसंख्या आहे. मुंबईत २६ रुग्ण आढळले असून, ठाणे महापालिका ९, नवी मुंबई ६, नाशिक महापालिका व सांगली महापालिका प्रत्येकी ४, कोल्हापूर महापालिका २, कल्याण महापालिका व उल्हासनगर महापालिका प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे.

राज्यात १४ जणांचा मृत्यू

‘कोरोनामुळे राज्यात या वर्षभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १३ जण सहव्याधीग्रस्त होते. त्यात कर्करोग, ब्रेनस्ट्रोक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार,श्वनविकार, क्षय असे विकार होते,’ अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Articles