सततच्या पावसाने शेती पिकाची कामे रखडली   

शेतकर्‍याला पाऊस उघडण्याची प्रतीक्षा
 
मंचर,(प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून लहान, मोठ्या स्वरूपात पाऊस पडत असून या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांची शेती कामे रखडली आहेत. ओल्या मातीत सरी फोडून उसाची लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. तर ऊसासह विविध पिकांची लागवड रखडल्याने पुढे जाऊन पिके लागवड केल्यानंतर बाजारभाव मिळेल का? पिकाची लागवड वेळेत होईल का या काळजीत शेतकरी आहे. आंबेगाव तालुक्यात घोडनदी, हुतात्मा बाबू गेनू सागर डिभे उजवा कालवा, डावा कालवा असल्याने आंबेगाव तालुक्याची बागायती तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असल्याने तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. 
 
तालुक्यातील शेतकर्‍याचा ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तसेच जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी जात असतो. मात्र यावर्षी ऊस लागवडीच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने शेती ओली झाली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही दिवस पाऊस उघडेल. अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे उसाची लागवड करणारे शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाची सरी काढून त्यामध्ये ऊस लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतकर्‍यांची ऊस लागवड या पावसाने रखडली असून पुढे जाऊन ऊस लागवडीला उशीर झाल्यास पुन्हा ऊस तोडणी ला देखील उशीर होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. अनेक शेतकर्‍यांची बटाटा, फ्लॉवर, कोबी यासह विवीध तरकारी पिके काढून शेत जमीन मोकळी झालेली आहे. मात्र माती ओली असल्यामुळे शेतीची मशागत करून त्यात दुसर्‍या पिकाची लागवड करता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पावसाने शेतात काम करणार्‍या महीला मजुरांना देखील रोजगार मिळत नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
 

Related Articles