भाडेवाढीमुळे पीएमपीचे पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटले   

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत प्रवासी संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. मागील पंधरा दिवसांत सरासरी १५ हजारांहून अधिक प्रवासी घटले असल्याचे दिसून आले आहे. 
 
मे महिन्यात पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी दहा लाख १४ हजार ७९३ होती. दिवसभरातील सरासरी उत्पन्न एक कोटी ४२ लाख २९ हजार ६६४ रुपये होते. मात्र, एक जूनपासून भाडेवाढ केल्यानंतर १५ जूनपर्यंत पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी नऊ लाख ९९ हजार ८३० पर्यंत आली आहे. म्हणजेच गेल्या दोन आठवड्यांत सरासरी दोन कोटी ११ लाख ८५ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
 
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांच्या हद्दीतील विविध ३९२ मार्गांवरून धावणार्‍या पीएमपीची एक जूनपासून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली. ही भाडेवाढ पाच टप्प्यांत करण्यात आली. 
 
पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे म्हणाले, पीएमपी प्रशासनाकडे अचूक प्रवासी संख्या मोजण्याचे साधन नाही. पीएमपी प्रशासनाने भाडेवाढ करण्यापूर्वी सेवा नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, ते झाल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी पाच किलोमीटर अंतराच्या आतील प्रवासासाठीही वीस रुपये भाडे आकारले जात आहे. पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
 
भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांना सुलभ सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. महिला प्रवाशांसाठी अनेक मार्गांवर विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यासह सुरक्षिततेसाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. तसेच, इतर उपाययोजनांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होताच पुढे प्रवासी संख्या देखील वाढेल.
 
- सतीश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक, संचालन विभाग, पीएमपी.
 

Related Articles