पुस्तकांची परंपरा न संपणारी   

अभिनेते किशोर कदम यांचे प्रतिपादन 

पुणे : डिजिटल जगात पुस्तकांच्या परंपरेवर, त्यांच्या अस्तित्वावर शंका घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. पुस्तकांची विक्री करणारी दुकाने आणि त्यांची वाढणारी संख्या पाहिली की, पुस्तके संपतील याविषयी काळजी करण्याचे कारण नाही, असे लक्षात येते. वाचकांचा ओढा पुस्तकांकडे दिवसेंदिवस वाढत आहे. पुस्तके नेहमीच टिकून राहतील, असे मत अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केले.
 
अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनातर्फे आचार्य अत्रे सभागृहात पुस्तकांच्या मान्सून महोत्सवाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘राजहंस’चे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर उपस्थित होते.कदम म्हणाले, मी महिन्यातून दोन वेळा पुस्तकांच्या दुकानात जातो. नवे पुस्तक विकत घेतो. उत्सुकतेपोटी विकत घेतलेली पुस्तके आपण लगेच वाचतो असे होत नाही. मात्र, कधी तरी वाचण्याच्या उद्देशाने पुस्तक घेत असतो. पुस्तक विकत घेणारी माणसे आणि त्यांची विक्री करणारे विक्रेते काळाबरोबर समृद्ध होतात. तिथे वाचलेली पुस्तके हीच त्यांची श्रीमंती होत जाते.
 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, उत्तम ग्रंथ प्रदर्शनाबरोबर व्याख्याने, कार्यक्रम यांचे आवर्जून आयोजन करणारी अक्षरधारा ही दुर्मिळ संस्था आहे. सध्या संवादचे रूपांतर भांडणामध्ये कधी होते हे कळत नाही. आज समाजाचा भावनिक उष्मांक वाढलेला दिसून येतो. या समाजाच्या स्वास्थ्यासाठी सहृदयतेचा पाऊस गरजेचा आहे. राजेश पांडे, रसिका राठिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. 
 

Related Articles