वाहतूक कोंडीचा गडकरी यांना फटका   

नियोजित भुयारी मार्गाची पाहणी न करताच जावे लागले माघारी

पुणे : बहुचर्चित शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजित भुयारी मार्गांची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. मात्र, येथील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे पाहणी न करताच त्यांना माघारी जावे लागले. शिवाजी रास्ता व बाजीराव रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या मार्गाने जाताना नागरिकांना नकोसे होते. 
 
येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी, यासाठी आमदार हेमंत रासने यांनी शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा अशा अडीच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता. फडणवीस यांनी त्यांच्या निवेदनावर सकारात्मक विचार करून पाटबंधारे विभागाशी चर्चा करून या भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. शनिवार वाडा ते स्वारगेट या शिवाजी रस्त्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४ अंतर्गत असल्याने या मार्गावर भुयारी मार्ग होऊ शकतो, असे आमदार रासने यांनी सांगितले. त्यासाठी प्रति किलोमीटर २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे देखील ते म्हणाले होते. या मार्गाची पाहणी करण्यासाठी काल केंद्रीय मंत्री गडकरी येणार होते.
 
यासाठी प्रशासनाने तयारी केली होती. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने तसेच केंद्रीय मंत्री पाहणीसाठी येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पोलिसांंनी रोखून धरल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रासने हे गडकरी यांच्यासह शिवाजी मार्गाने जाऊन शनिवार वाड्याला वळसा घेऊन बाजीराव रस्ता अशी पाहणी करणार होते. मात्र, पोलिसांना याची माहिती नसल्याने वाहतूक अलीकडेच रोखून धरण्यात आली. परिणाम, मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गडकरी यांना मार्गाची पाहणी न करताच माघारी जावे लागले.

आयुक्तांनाही वाहतूक कोंडीचा फटका 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम हे देखील या ठिकाणी येणार होते. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने त्यांचा ताफा शनिवार वाड्यापर्यंत पोहचू शकला नाही. यामुळे त्यांना पायी चालत यावे लागले. मात्र, त्यापूर्वीच गडकरी निघून गेले होते.

... तरी निधी आणणार :  रासने 

केंद्रीय मंत्री गडकरी पाहणी न करताच निघून गेल्याने आमदार हेमंत रासने यांना माध्यम प्रतिनिधींनी याचे कारण विचारले. त्यावर रासने म्हणाले, गडकरी नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून या पाहणीसाठी येणार होते. याची माहिती देखील प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, योग्य समन्वय न झाल्याने  या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. गडकरी यांना पुढील कार्यक्रमाला जाण्यास उशीर होत होता; यामुळे ते निघून गेले. असे असले तरी त्यांना या भुयारी मार्गाबाबत निवेदन देण्यात आले असून यासाठी मंजुरी मिळवून निधी आणला जाईल. सध्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते येत्या १५ दिवसांत पूर्ण केले जाईल, असे हेमंत रासने म्हणाले. 
 

Related Articles