साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी दसरा   

पालखी सोहळ्याने पुण्यात भक्तीमय वातावरण

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. ‘ज्ञानोबा-तुकराम’, माऊली...माऊली या नामघोषांनी सारा परिसर दूमदमून गेला होता. ज्येष्ठांनी वारकर्‍याचा पेहराव तर लहानमुलांनी विठ्ठल-रुखमाईंचा वेषभूषा घेत वारकर्‍यांची सेवा केली. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पावन झाले. पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात दिवाळी-दसर्‍यासारखा आनंद, उत्साह दिसून आला.
 
पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या, पुष्पवृष्टी करीत पालखीचे स्वागत करण्यात आले. टाळ-मृदूंगाच्या गजरात आणि अभंगांच्या गानात वातावरण दुमदुमून गेले. शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि कुटूंबियांनी चहा-बिस्किट, फराळ देऊन वारकर्‍यांची सेवा केली. शिस्तबद्ध रांगा, प्रेमळ संवाद, एकमेंकाना मदतीचा हात देत हजारो वारकरी ज्ञानोबा माउली तुकारामच्या गजरात तल्लीन झाले होते.
 
दरवर्षीप्रमाणे पालखी मार्गासह शहर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली. विविध साामाजिक संघटना आणि रुग्णलयाच्या वतीने वारकर्‍यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना चष्मेदेखील देण्यात आले. ठिकठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नाभिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने वारकर्‍यांची दाढी, कटिंग करत सेवा केली. परिट समाजाच्या वतीने कपडे इस्त्री करुन देण्यात आले, असे विविध उपक्रम राबवून पुणेकरांनी वारकर्‍यांची सेवा केली.
 
सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश
 
मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने  पालखी सोहळ्यानिमित्त वारकर्‍यांसोबत ईद मिलन उपक्रम समर्थ व्यायाम मंदिर येथे राबविण्यात आला. उपक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष मुश्ताकभाई पटेल यांच्या हस्ते सर्व वारकर्‍यांना शिरखुर्मा देण्यात आला. यावेळी श्री नवनाथ प्रासादिक दिंडीचे प्रमुख पांडुरंग सीताराम येळवंडे, मेधा दिंडीचे नारायण धनवडे, सुर्जी अंजनगाव दिंडीचे गोपाळ महाराज तसेच पप्पूशेठ पंचोली, युसूफ बागवान, विकास भांबुरे, मुस्तफा शेख, सय्यद अली, आय.टी. शेख, ड. मारुफ पटेल, अफजल पटेल, परवेझ शेख आदी उपस्थित होते.
 
या उपक्रमाबाबत बोलताना पटेल म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून ट्रस्टतर्फे वारकर्‍यांसोबत ईद मिलन साजरे करून धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात आहे. याच अनुषंगाने ते गणेशोत्सव, पालखी सोहळा, भाऊबीज आणि रंगपंचमी अशा विविध हिंदू सणांमध्येही शिरखुर्मा वाटप करतात, अशी माहिती विकास भांबुरे यांनी दिली. पांडुरंग महाराज येळवंडे यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार परवेझ शेख यांनी मानले.
 
मार्केटयार्डात ३५ हजार वारकरी मुक्कामी 
 
व्यापार आणि समाजसेवा अशी मार्केटयार्डाची ओळख आहे. वर्षभर समाजसेवा करणारे व्यापारी पालख्यांचे शहरात आगमन होताच वारकर्‍यांच्या सेवेत रमले आहेत. मार्केटयार्डातील विविध विभागात सुमारे ३० ते ३५ हजार वारकरी मुक्कामी आहेत. वारकरी दोन दिवस मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्केटयार्डातील भुसार, फळे, भाजीपाला, कांदाबटाटा, फुळे या विभागात वारकरी मुक्कामाला असतात. या वारकर्‍यांची निवास, भोजनाची व्यवस्था व्यापार्‍यांकडून केली जाते. तसेच भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दोन दिवस व्यापार्‍यांकडून वारकर्‍यांना औषधे, छत्री, साड्या, भोजन तयार करण्यासाठी लागणारी मोठी तसेच छोटी भांडी, रेनकोट अशा उपयोगीे वस्तूंचे वाटप केले जाते. त्यामुळे आज (शनिवारी) मार्केटयार्डात वारकर्‍यांनी गजबजलेले असणार आहे. 
 
मार्केटयार्डात मुक्कामी येणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असल्याने व्यापारी तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातच पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा तसेच शौचालयाची व्यवस्था आणि रोजच्या रोज सफाईची कामे केली जातात. राजेंद्र बाठिया, नवीन गायल, प्रवीण चोरबेले. राजेंद्र गुगळे, जयभगवान गुप्ता, राजकुमार टाग, पोपटला ओस्तवाल, विनोद गोयल, शिवकुमार गोयल, विजय मुथ्था, रोहन जाधव, मिलिंद जाधव, महेश शिर्के, बापू भोसले, नामदेव यणबर, पाडुंरग सुकेर, नामदेव निकम या व्यापार्‍यांकडे दिंड्या मुक्कामाला असतात.  
 
फळ विभागात मालीश सुविधा
 
फळ विभागातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव, मिलिंद जाधव, महेश शिर्के यांनी वारीत पालखीसोबत चालून थकलेल्या वारकर्‍यांची सेवा म्हणून मालीश करण्याची सुविधा उपलब्ध केली होती. ही सुविधा आज (रविवारी) उपलब्ध असणार आहे. तसेच वारकर्‍यांना आवश्यक सेवा पुरविण्यात येणार असल्याचे रोहन जाधव यांनी सांगितले. 
 
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा दिंडीत सहभाग
 
‘आमच्या पालकांनी आत्महत्या करून चुक केली, तुम्ही करू नका’ ‘आत्महत्या हा पर्याय नाही’ असा संदेश देत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची दिंडी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम येही मुले आली होती. पालकांनी आत्महत्या केलेली या आश्रमात ७० मुले शिकतात. त्यापैकी ४५ मुले आश्रमाचे चालक त्र्यंबकराव शिरोडे यांच्यासह विविध शिक्षकांबरोबर सहभागी झाली. मुलांनी टाळ वाजवून भजन तर केलेच. शेतकर्‍यांनो आत्महत्या करु नका असे संदेश देणारे फलक त्यांनी हातात घेतले होते. त्यामध्ये ‘आम्ही शेतकर्‍यांच्या पोटी जन्म घेतला, यात आमचा काय गुन्हा’ ‘शेतकरी वाचेल, तर देश वाचेल’ ‘देवा भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे’ असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडीतून दिला.

Related Articles