शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी   

पुणे : शहर आणि आजुबाजूच्या परिसरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोथरुड, कर्वेनगर, बावधन, सूस, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, औंध, बोपोडी, हडपसर, धानोरी, येरवडा भागातील रस्त्यांवर पाणी साठल्याचे समोर आले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडे दिवसभरात पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. 
 
गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून शहरातील विविध भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी देखील पाऊस सुरुच होता. अचानक १५ ते २० मिनिटांसाठी मुसळधार पाऊस पडत होता. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेवर ताण आल्याचे पहायला मिळाले. पावसाळी गटारे आणि महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेजलाईनमध्ये कचरा अडकल्याने काही भागात पाणी वाहून जाण्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते. 
 
महापालिकेने सुरू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिवसभरात विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना दिली. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर तातडीने त्याची दखल घेत संबधित भागातील क्षेत्रीय कार्यालयातील पथकाला पाणी साठलेल्या भागाची माहिती दिली जात होती. त्यानंतर महापालिकेचे पथक तेथे जाऊन साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करत होते. तक्रार आल्यानंतर आणि महापालिकेचे पथक जागेवर गेल्यानंतर १० ते २५ मिनिटांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सोनूने यांनी सांगितले.
 
दरम्यान, रस्त्यावर साठलेले पाणी काढून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. रस्त्यावर साठलेले पाणी तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. 

या भागांत साचले पाणी 

धायरी भागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नर्‍हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल ते वारजे भागाकडे जाणार्‍या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाणारे चेंबर तुंबल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून कचरा काढल्यानंतर पाणी वाहून गेले.
पर्वतीकडून निलायम चित्रपटगृहा जवळील पूल उतरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला असलेले झाड पडले. झाडाच्या फांद्या, कचरा चेंबरवर पडल्याने पाणी वाहून जाताना अडचण निर्माण झाली होती.
आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराकडे जाणार्‍या गल्लीच्या परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते.
स्वारगेट चौक आणि हडपसरमधील सिद्धेश्वर हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.
शहराच्या उपनगरांसह मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजीमहाराज रस्ता आणि इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक

मागील वर्षी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील नदीकाठाजवळ असलेल्या एकतानगरी सोसायटीत पाणी घुसले होते. यंदाच्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्याचा फटका एकतानगरीला बसू नये,यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. आपतकालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथक येथे तैनात करण्यात आले आहे, असे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले.
 
शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यास सुुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापण विभागाची पथके पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊन आवाहन करत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनाही धोक्याचा इशारा दिला जात आहे. आतापर्यंत खडकवासला जवळच्या १२ ते १५ घरे वगळता इतर कोठेही पाणी शिरलेले नाही.

- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका

 

Related Articles