पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ   

मुंबई, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल  कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात, याची माहिती  असताना तो धोकादायक पूल  खुला का ठेवला? असा सवाल करत या पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित  दोषी  अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
 
कुंडमळा येथील लोखंडी पूल  कमकुवत झाला होता.  त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही? सरकार दुर्घटना होण्याची वाट पाहात बसले होते का? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती, असे प्रशासन सांगत आहे.  पण, अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन आणि  प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले; त्यातील अनेकांना वाचवण्यात आले.  पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी आहेत. या घटनेला जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

Related Articles