मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय   

तीन महिन्यांत आराखडा तयार करण्याचे आदेश

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे  यांनी दिल्या आहेत.मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे  मंत्रालयात मंत्री राणे यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. 
 
मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी  मोठ्या संधी असल्याचे सांगून नितेश राणे म्हणाले की, विशेषतः बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वॉटर मेट्रोचे मार्ग निवडताना या संधींचा पूर्ण विचार करावा. जास्तीत जास्त प्रवासी असणारा आणि जास्तीत जास्त फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकिटांचे दर ठरवताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील, असे पाहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच, जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. त्यांना वाहतूकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.
 
मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच १० मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच, जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी एकूण अडीच हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
 

Related Articles